बघा आवडतंय काय 👇
माझ्या माहेरचं अंगण
कोरोना कोरोना कोरोना खरंच त्रासलेत सगळे हया कोरोना मुळे. किती तो त्रास बरं लहान मुलांपासनं तर मोठ्यांपर्यत सगळ्यांनाच त्याच्या मुळे त्रास होतोय पण तो मात्र कमी व्हायचं नावच घेत नाही आहे दिवसागणिक तो वाढतोच आहे.गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत सगळ्यांनाच त्याने वेठीस धरून ठेवलंय,त्याने कोणालाही कुठलेही सण देखील साजरे करू दिले नाही म्हणजे तो(कोरोना)कितीही वाईट असला ना तरी काही बाबतीत या समाजाला चांगलाच धडा शिवून गेलाय असे म्हणता येईल,खरंच सर्व धर्म समभाव ठेवायला हवा भेद भाव करू नये तेच इथे घडताना दिसतंय, राजकीय पक्षातील लोक सुद्धा या अश्या परिस्थितीत राजकारण सोडून बाकी सगळं विसरून आता लोकांनी लोकांसाठी कामाला/मदतीला यायला पाहिजे असे सांगू लागलेत.
खरं सांगायचं तर कोरोना हा तर डिसेंबर पासून सुरू झाला होता पण तेव्हा कुणालाही त्याच गांभीर्य इतकं कळलंच नसावं आणि कुणी त्याला इतकं गांभीर्याने घेतले पण नाही पण खरी सुरुवात झाली ती मार्च पासनंमुलांच्या परीक्षा जेमतेम सुरूच झाल्या होत्या की,अचानकपणे त्या कोरोनाच्या भीती पायी हळू हळू सगळं बंद बंद ची सुरुवात झाली.lockdown मुले शाळा तर बंद झाल्याचं पण अशी वेळ आली की, पेपर देखील मुलांचे रद्द करावे लागले.लहान मुलांचे ठीक आहे हो पण मोठ्या मुलांच्या जेव्हा परीक्षा रद्द झाल्या तेव्हा हुशार आणि टॉपर असलेल्या मुलांना जरा जडच गेलं ते,कारण जेमतेम पास होणारे मुलंही चांगले grade घेऊन पास झालेत पण असो जीवापुढे कुठे काय चालतं असं म्हणतात ना "सर सलामत तो पगडी पचास",तसच झालं ते,माणूस चांगला राहिला तर कितीही परीक्षा देता येतील.
नवीन नवीन जेव्हा lockdown सुरू झाले तेव्हा सगळ्यांनाच मस्त वाटायचे कारण सगळे जण आपापल्या घरी एकमेकांना वेळ देऊ लागले. नाहीतर आता पूर्वी सारखी एकत्र कुटुंब पद्धती राहिलीये तरी कुठे, असली तरी ती बोटांवर मोजण्या इतपतच कुटुंब तसे उरले असावेत पण या कोरोना मुळे म्हणा की, काय प्रत्येक जण घरात राहून वेळ देऊ लागला,आपले छंद जोपासू लागला असे बरेच काही करता यायला लागले,नवीन नवीन तर किती उत्साह होता सगळ्यांना, नवीन नवीन पदार्थ करणे, खाऊ घालणे त्याचे फोटो फेसबुक, wtsap स्टेटस वर share करणे असे बरेच काही सुरू होते,तसेच स्त्रियांना पण बराच उत्साह होता त्या पण वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करून टाकणे असे सगळे सुरू होते,पण जसा जसा वेळ जायला लागला तसा तसा आता लोकांचा उत्साह कमी होत चाललाय आणि कोरून विषयीची भीती पण कमी होत चालली आहे.
या सगळ्या कोरोनाच्या प्रवाहात मुली-सुनांना यंदा माहेरपण उपभोगायला मिळाले नाही.माहेरपण म्हटलं की सगळ्यांनाच एक वेगळा आनंद उत्साह असतो प्रत्येकच आजी-आजोबाला आपलं गोकुळ गजबजलेलं असावं असं वाटत राहतं.असाच एक संवाद आजी-आजोबा,आई- बाबा,सासुसासरे म्हणा सगळ्यांमध्येच होत असावा.आजकाल मूलं-सूना,जावई-मुलगी कितीही लांब राहत असले तरी वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदातरी आपल्या मूळ गावी आजोळी पंजोळी भेट देऊन आठ दिवस सासरी आणि आठ दिवस माहेरी येऊन मनसोक्त आनंद घेऊन त्या आठवणी आपल्या सोबत शिदोरी म्हणून घेऊन जातात नात्यांमधली मज्जाच काही और असते खरंय ना.तसाच एक माझ्या कल्पनेतील तो संवाद मला इथे सांगावासा वाटतोय.एका आई बाबांचा हा संवाद बघा अक्षरशः डोळ्यात पाणी आणतो की नाही.
आई म्हणते :- अहो,ऐकलं काय यंदा आपलं गोकुळ काही गजबजायचं नाही हो.
बाबा म्हणतात :- का गं असं का म्हणते आहेस.
आई म्हणते :- अहो,लेकरं येतात तेव्हा दरवर्षी काय थाट असतो घराचा नाही का?
बाबा ऐकत असतात खिडकीबाहेर बघत...त्यांना तरी कुठं करमत होतं,ह्या कोरोनामुळे पोरी यंदा माहेरपणाला येऊ शकणार नाही हे स्पष्ट दिसत होतं मग बाबांनी आईला दिसणार नाही अशी हळूच मान वळवून त्यांनी चष्मा काढून डोळे पुसले आणि ते बडबडू लागले,ते ऐकताना आईच्या डोळ्यांची धार काही केल्या थांबत नव्हती.
दरवर्षीच्या उन्हाळ्याची चाहूल आणि त्यात मुली/मुलं येणार असले की, मनाला जो गारवा मिळतो तो औरच असतो,तिचं येणं म्हणजे घरभर प्राजक्त होऊन दरवळण तिच्या लेकरांच्या किलबिलाटाने गजबजलेलं आपलं हे घरटं किती सुंदर वाटतं ते सुंदर क्षण कसे धरून ठेवावे वाटतात पण ते क्षणही लगेच संपू लागतात.
चार दिवसांपासुन गजबजलेले घर एकदम शांत होऊ लागतं,ती येणार म्हणुन वाटेवर लागलेले आनंदी, उत्सुक डोळे आज सतत ती जाणार म्हणुन भरून येत असतात,हात, पाय ,मन कोणीच कामं करायला तयार नसतं,कारण आज त्या घरट्यातली पिल्लं पुन्हा आपल्या घरी निघणार असतात. ती थकलेली आई हळूच स्वयंपाकघरात जाऊन पदराने डोळे पुसत तिच्यासाठी लोणचे,चटण्या,फराळाचे बांधुन तिच्या बॅगवर आणून ठेवत असते,बाबा येता जाता नातवंडांचे पसरलेले कपडे जमा करून बॅगवर आणुन टाकत असतात,मुलगी आपलं दोन दिवसात माहेरच्या अंगणात रेंगाळलेल मन गोळा करत असते. आणि म्हणूनच तिला तर काही सुचतच नसते,'चला उशीर नको व्हायला',या सुचना देखिल त्यांना ऐकून न ऐकल्यासारख्या वाटत असतात,आणि मग त्या अंगणातल्या परिजातकाकडून मग तुळशीच्या कानात आई बाबांच्या काळजीचं वचन घेऊन घरात येतात पोट भरावं म्हणून जेवणं होतात,आवडीची भाजी देखिल आज मन आनंदी करू शकत नाही,घड्याळ आज जास्तच वेगाने पुढं पळत असते असं त्यांना आणि त्यांच्याआईबाबांना पण वाटत असतं,आजोबांचं चारदा नातवंडांना गोंजारून झालं असतं,मामाची देखिल भरपूर मस्ती करून होते भाच्यांशी.
तिला लग्नाच्या आधीच्या सगळ्या आठवणी डोळ्यात जमा व्हायला लागतात,आपल्या साठी आपल्या आई बाबांनी केलेले कष्ट आठवतात,तिला मनात वाटतं खरंच काय हि रीत लावली आहे समाजाने जिथे ज्या अंगणात मुली मोठया झाल्या तिथून एक दिवस जाऊन रुजावचं लागतं दुसऱ्याच्या अंगणात पण त्यामुळेच का होईना कदाचित हि रितच असावी आपली आणि आपल्यानंसाठी ओढ निर्माण होण्यासाठी आणि म्हणूनच ओढ ही वाढत असावी,म्हणूनच आलं कि मन रेंगाळत,पाय निघत नाही माहेरहून आणि माहेरी यायचंय ह्या कल्पनेने,फुलपाखरू होऊन मन आधीच या अंगणात आनंदाने भिरभिरत राहतं, ती हरवते त्या आपल्या माहेरच्या सगळ्या आठवणीत.
शेवटी माहेरून सासरी निघण्याची ती वेळ येतेच,आई कुंकू लावून आपले अश्रू रोखत तिची ओटी भरते,बाबा नातवंडांना पैसे देऊन पापे घेऊन आपले अश्रू लपवत मुद्दाम बाहेर पडतात,ती पण आपलं रडणं रोखून ठेवते आणि उगाच करड्या आवाजात त्यांना एकमेकांची काळजी घ्यायला सांगते,गाडी नीघते एवढया वेळ लपलेले अश्रू टपकन ओघळायला लागतात,गाडी दिसेनाशी होई पर्यंत ह्या दोघांचे हात टाटा करत असतात,गाडीत मात्र क्षणात टचकन ओले झालेले डोळे परत सासरच्या वाटेवर धाव घेतात, माहेरची वाट तिला विसरावीच लागते कर्तव्यासाठी,आपलेपणासाठी लग्न झाल्यावर तीच आपली माणसं,तेच आपलं घर यासाठी.
माहरेच्या वाटेवरचे हे डोळे मात्र कोरडे होतच नाहीत कारण ती आठवणींची ओल डोळ्यात कायम ठेऊन ते डोळे तसेच त्या माहेरवाशिणीच्या वाटेवर आस लावून बसतात पुन्हा तिच्या आठवणींची फुलं गोळा करायला..
असंच असत ना सगळं....
आईला ते सगळं ऐकून बोलता पण येत नाही पण तरीही आपला कठोर हा नवरा लेकीसाठी किती हळवा हे बघून ती सुखावते आणि रडतच म्हणते,
" पण यंदा सगळ्या माहेरची अंगण सुनी सुनीच राहिली नाही का," आता मात्र ते दोघेही भरभरून रडून घेतात..तेवढ्यातच व्हिडिओ कॉल येतो,अर्थात तिचाच.......आणि ती त्यांना विचारते आई बाबा डोळे का असे पाणावलेत तुमचे?दोघेही लगेच म्हणतात तुझ्या आणि नातवंडाच्या आठवणीने गं..फोनवर दोन्ही बाजूने आता फक्त हुंदके ऐकू येत असतात.देश कितीही प्रगत झाला आणि कितीही इंटरनेट सुविधा असल्या तरी इंटरनेट वरून आपण माहेरपण अनुभवू शकत नाही हेही तितकेच खरे,खरे की नाही तुम्हीच सांगा.
(आणि सगळेजनच मनोमन म्हणत असतात जा रे कोरोना लवकर निदान दिवाळीला तरी फुलवू दे माझ्या माहेरचं अंगण)
ऍड. सौ. क्षमा आ.बासरकर- धर्मपुरीवार
सदस्य, बाल न्यायमंडळ,चंद्रपूर.
फोन न.८४८४०८२२२४
Very Good, Keep it up
ReplyDeleteThank u😊
Delete