Valentine's week or saptpadi
व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी
मी हा जो लेख लिहिलाय हे माझे व्यक्तिगत/वयक्तिक मत आहे त्यामुळे कुणाला नसेल पटले तर वाईट वाटून घेऊ नये.
व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. हा दिवस सेंट व्हॅलेन्टाईन नावाच्या हुतात्म्यांच्या नावाने साजरा करतात. इ. स. 270 च्या आसपास एक संत व्हॅलेन्टाईन होउन गेले. एका दंतकथे नुसार संत व्हॅलेन्टाईन चा हा बलिदान दिवस आहे. परंतु युरोप मध्ये अजूनही संदिग्धता आहे की, नक्की कोणत्या व्हॅलेन्टाईन नावाच्या व्यक्ति पासून सुरुवात झाली.
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जात असला तरी, तिचा उत्साह महिन्याच्या सुरुवातीपासूनच तरुणांमध्ये सुरू होतो. व्हॅलेंटाईन डेच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन सप्ताह सुरू होतो,ते दिवस प्रेमाच्या प्रतीकावर आणि त्याच थीमवर आधारित असतात, व्हॅलेंटाईन आठवडा 7 फेब्रुवारीच्या रोज डेला प्रारंभ होतो, तो 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमिस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस आणि 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे अशा रीतीने तरुणाई साजरा करतात.
Rose day, chocolate day, promise day, Valentine day अरे किती ते डेस,आता तर असं वाटायला लागलंय की,आपण भारतात आहोत की,विदेशात. आपला भारत देश म्हणजे संस्कृतीप्रधान देश म्हणून प्रचलित असताना कसले ते kiss day, hug day आणि काय काय days सुरू आहेत. अरे प्रेम ही इतकी सुंदर गोष्ट आहे की,ती अशी एकच दिवस साजरी करून पूर्ण होण्यासारखी आहे काय?काय प्रभाव पडतो आपल्या तरुणाई वर त्याचा. मुलं असो मुली किती वाईट प्रभाव पडतोय त्यांच्यावर.नुसती तरुणाई काय हो लहान मुलामुलींवर देखील त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो याचा कधी विचार केलाय काय?
अरे काय तो प्रॉमिस डे मनवता,कसले प्रॉमिस करतात आजकालचे मुलंमुली प्रेमामध्ये. स्वतः स्वतःला प्रॉमिस करा म्हणावं की,आपण एक चांगला व्यक्ती बनायला हवे, आपल्या आईवडिलांना प्रॉमिस करायला हवे की,आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं बनून त्यांचे नाव उंच करण्याचा प्रयत्न करायला हवे आणि ते प्रेमामध्ये rose day वगैरे साजरे करण्यापेक्षा काहीतरी चांगले काम करून त्याच गुलाब फुलाने तुमचा कुणीतरी सत्कार करायला हवा जेणेकरून तो दिवस सगळ्यांच्या लक्षात राहायला हवा असे काहीतरी करून दाखवायला हवे.
बालकांच्या क्षेत्रात काम करताना मला प्रकर्षाने जाणवले की,आजकालची तरुणाई ही कसल्याश्या प्रेमप्रकरण आणि हव्यासाला बळी पडतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. बऱ्याचशा बलात्काराच्या केसेस ह्या प्रेमप्रकरणातून झालेल्या असतात.सप्तपदीच्या सात वचनातच सगळे दिवस आल्यासारखे असतात खरे की नाही मग ह्या सगळ्या days चा अट्टाहास का? त्या 7 दिवसांचा valentine week मनवण्यापेक्षा त्या सप्तपदीचे महत्व तरुणाईने जाणून घेऊन त्यानुसार वागले तर असे कितीतरी गुन्हे कमी होतील आणि लग्न झाल्यावर करा म्हणावं डेस साजरे पण लग्न व्हायच्या आधी तरी आपल्या संस्कृतीचे भान ठेवून वागायला तरुणाईने शिकायलाच हवे. तरच आपल्या देशात संस्कृतीचे महत्व टिकून राहील.
विवाहाच्या बंधनातील ‘सप्तपदी’ हा विधी खूप महत्त्वाचा असतो. मला वाटतं जुन्या काळातल्या स्त्रिया लग्नाच्या वेळी वयाने लहान होत्या. शिक्षण जेमतेम झालेलं मग तिला जो उपदेश सप्तपदीतून दिला जात असे तो अर्थपूर्ण होताच. पण आपण आजच्या बदलत्या काळानुसार मुलीला आणि मुलाला सप्तपदीची नवी सूत्रं दिली तर ती तिला आणि त्याला निश्चितच उपयोगी पडतील असं वाटतं.म्हणूनच valentine week साजरे करण्यापेक्षा पुढील सात वचन लक्षात ठेवावे.
1) हे सौभाग्याकांक्षिणी! तू आता विद्यासंपन्न झाली आहेस. संगणकाचे ज्ञानही अवगत केले आहेस आणि सहजपणे तू तुझ्या नोकरीतही कौशल्यं प्राप्त केली आहेस. तुझ्या पायात सामर्थ्य आहे. पंखात भरारी घेण्याचं बळ आहे; पण आज तू दोन घराण्यांना तुझ्या सद्विचारांनी एकत्र बांधणार आहेस.
2) हे रमणी, तुझं हे दुसरं पाऊल आहे, त्या पावलावर तू पतीसमवेत सुंदर स्वप्न पूर्ण करणार आहेस. या पावलावर तुला सासरच्या घरात आनंद निर्माण करायचा आहे. तू आनंदी असशील तरच तुझं कुटुंब आनंदी होईल. त्यामुळे ‘आनंदी जीवन’ हे सूत्र लक्षात ठेव.
3) हे प्रज्ञावंत मुली, तू खूप शिकलीस आणि नोकरीही करतेस याचा अहंपणा करू नकोस. कुणास तुच्छ लेखू नकोस. माणसातलं माणूसपण जपत जपत सासु-सासर्यांवर आई-वडिलांसारखं प्रेम करण्याचं ठरवून तू तिकडं पाऊल उचलले आहेस.
4) हे विद्याश्री, तुला पतीची साथ आयुष्यभर हवी आहे असं मनोमन ठरवून चौथे पाऊल उचलणार आहेस. पतीच्या सोबत त्याच्या घरातील अनेकांशी तू नव्या नात्यांचा सुंदर गोफ बांधणार आहेस.
5) हे ललने, पाचवं पाऊल उचलताना तू हे लक्षात घे की घराचा ‘ताल’ आणि ‘तोल’ तुला छानपैकी सांभाळायंचा आहे. जेवढं प्रेम वाटेवरती देत जाशील त्याच्या दुप्पट प्रेमाने तुझी ओंजळ नक्की भरेल.
6) हे मानिनी, सहाव्या पावलाशी तू हे ठरवणार आहेस की ज्या योग्य, चांगल्या परंपरा, रीतिरिवाज आहेत ते तू पुढे नेणार आहेस. पण नवविचारांचे बदल घेऊन त्याची भर टाकणार आहेस. नव्या विचारांच्या दिशेने जाताना कुणी दुखावणार नाहीना म्हणून तू काळजी नक्कीच घेणार आहेस.
7) हे सृजनशालिनी, तू तुझ्या संसारवेलीवर काही दिवसांनी नवीन जीव निर्माण करणार आहेस. तो मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे. तुला समभावनेनं त्याचं थासांग पालन-पोषण करायचं आहे. या चिमुकल्या जिवाला नवीन जग दाखवाचं आहे हे लक्षात घे.
ऍड. सौ.क्षमा वि.बासरकर - धर्मपुरीवार,
अध्यक्ष बाल कल्याण समिती चंद्रपूर.
8484082224