Tuesday, October 17, 2023

अन्न हे पूर्णब्रह्म

                                  अन्न हे पूर्णब्रह्म 

                    वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।

                     सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

                    जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

                       उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म l

तोंडात घास घेताना श्री हरीचे नाव घ्या, फुकटचे नाव घेतल्याने सहजच हवन (होम) होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात् परब्रह्म आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर एक यज्ञकर्म आहे म्हणून समजा.असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत.

अन्न हे पूर्णब्रह्म ही म्हण आता हळू हळू लोप पावत चालली असे म्हणायला हरकत नसावी असे मला वाटते. कारण आजकालची तरुण पिढीला सकस आणि पौष्टिक आहार काय हे सांगायला गेले की ते अक्षरशः कानाडोळा करतात. म्हणजे पुरी मोड आलेली मटकीची उसळ ही चिवडा पोह्यासोबत नाश्त्याला दिली जात असत पण आता मुलांना तसलं काही नको असतं त्यांना 2 min मे मॅगी नूडल्स,cheese pasta असले प्रकार हवे असतात.आणि मग काही आया पण लवकर होतं म्हणून तेच बनवून देतात.पण ते सारखं सारखं खाणं मुलांसाठी किती घटक असतं हे कुणालाच कळत नाही.तेच छान आईने मोड आलेल्या कडधान्याचे धिरडे, किंवा अप्पे असे प्रकर मुलांना दिले तर मुलाचं आरोग्यही धोक्यात येणार नाही.छान रोज सात्विक आहार घेतला तर कुठलेही रोगराई होण्याची शक्यता कमी असते.म्हणून पूर्वीचे लोक सकस आणि पौष्टिक अन्न घेत त्यामुळे पूर्वीची पिढी अजूनही ९० पार करत शतक गाठू  शकतात.पण अताची पिढी तर ९वी -१० वीतल्या मुलाला देखील heart attack चा धोका आहे. आजकालची मुलं जीम लावतात पौष्टिक आहार घेण्याऐवजी त्या जीम मध्ये कुठलसं पावडर देतात ते मुलं घेतात.आणि आपल्या आयुष्यातले क्षण कमी करून घेतात. नियमित योगासन आणि पौष्टिक कडधान्य युक्त आहारचे सेवन जर सगळ्यांनी सुरू केले तर बऱ्याच गोष्टींना आळा बसेल व आयुष्य वाढेल असे माझे मत आहे.

आपली संस्कृती विदेशी लोक अनुकरण करतात आणि भारतीय लोक विदेशी लोकांचे अनुकरण करतात.भारतीय कृषी संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या ‘तृणधान्या’ला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संयुक्तराष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष जागतिक धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघात यासंबंधीचा ठराव मांडला होता. पिकांना तृणधान्य म्हणून प्राधान्य मिळाले की जागतिक स्तरावर यासंबंधीची जागृती अधिक वाढणार आहे. तृणधान्याच्या पिकांकडे अधिक लक्ष वाढावे म्हणून भारतानेही २०१८ हे वर्ष राष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून साजरी केले होते. यापूर्वी देखील कृषिशास्त्रज्ञ प्रा.एम.एस. स्वामिनाथन यांनीही ‘पौष्टिक धान्य’ हा शब्द प्रचारात आणला होता. अन्नधान्य भारतीयांचे प्रमुख अन्न म्हणून तृणधान्य ओळखले जात होते. मात्र, काही वर्षांपासून त्यात घट होत आहे. आपण आपले धान्य विसरून पाश्चात्त्य धान्याच्या मागे लागलो आणि विविध व्याधींना बळी पडलो. आता याच व्याधींपासून मुक्तता हवी असेल तर तृणधान्याशिवाय पर्याय नाही, हे सत्य आहे. हे सत्य जगाने ओळखले म्हणून जगातील विविध देशांमध्ये तृणधान्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. ‘युनेस्को’ने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त तृणधान्याची उत्पत्ती, स्थित्यंतरे, त्याच्यापुढील आव्हाने याचा आढावा घेणे गरजेचे आहे.

सध्या ‘फास्ट फूड’चा जमाना असल्याने तृणधान्याला महत्त्व दिले जात नाही. आजकालची बच्चा कंपनी आणि तरुण वर्ग तर नुसताच त्या फास्ट फूड च्या मागे असतो. म्हणजे त्यांना सकस भोजनापेक्षाही एक पिझ्झा, पास्ता, नुडल्स असे प्रकार खाल्ले की, ते त्यांचे संपुर्ण रात्रीचा आहार झाला असे समजतात.परंतु या स्ट्रीट फूड वाल्यांनी देखील असे तृणधान्य , कडधान्य वापरून काहीतरी innovative recipe बनवायला हवी जेणेकरून मुले,तरुण वर्ग आवडीने खातील व त्याचा कंटाळा करणार नाही आणि पौष्टिक पदार्थ पोटात जातील.भारतात तृणधान्याच्या लागवडीखालील क्षेत्रांत सातत्याने घट होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘युनेस्को’ने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य (मिलेट्स) वर्ष जाहीर केले आहे. केंद्र सरकारनेही त्या दृष्टीने सजग धोरणे आखण्याची सुरुवात केली आहे.

जगातील प्रमुख संस्कृतींपैकी प्रत्येक संस्कृतीतील लोकांनी पोषणासाठी तृणधान्यांचा प्रामुख्याने वापर केला आहे. प्रत्येक धान्याचे प्राथमिक रूप तृणधान्यच असते. शेतामध्ये पिकाची वाढ होत असताना त्यात निर्माण झालेले बियाणे म्हणजेच तृणधान्य होय. तृणधान्यांमध्ये तीन प्रकारच्या घटकांचा समावेश असतो. कोंडा म्हणजे तृणधान्याच्या सर्वांत बाहेरील आवरण असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक (फायबर) मुबलक प्रमाणात असतात. यातील दुसरा घटक असलेल्या अंकुरापासून दुसरे पीक उगवू शकते. या अंकुरामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीचा समावेश असतो. एन्डोस्पर्म हा तृणधान्याचा मुख्य खाद्यपुरवठा करणारा घटक आणि तृणधान्याचा सर्वाधिक भाग याने व्यापलेला असतो. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात स्टार्च आणि प्रथिने असतात. यामधील स्टार्च हा शरीराला ऊर्जा पुरवतो. तृणधान्यांमध्ये असलेले लॅक्टिक अँसिड मोठ्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करते. या जीवाणूंमुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते; पोषणाचे शोषण अधिक चांगल्या रीतीने होते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. भात व गहू या पिकांच्या तुलनेत तृणधान्यांमध्ये प्रोटिन, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, खनिज पदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. तृणधान्याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो आणि आयुर्मानही वाढते. यासाठी आहारामध्ये तृणधान्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. तृणधान्य हे खाणाऱ्यासाठी अतिशय उत्तम असे मानले जाते. त्याचप्रमाणे खनिजे, जीवनसत्त्वे व अँटिऑक्सिडंट्सचा यात भरपूर प्रमाणात समावेश असतो. हे धान्य रोग होण्यापासून बचाव करतेच; परंतु रोग झाल्यानंतरदेखील शरीराची झीज भरून काढण्याचे मोलाचे काम करते.

सरकारी शाळांमध्ये मुलांना आठवड्यातून एकदा तृणधान्य दिले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना करणे आवश्यक आहे. पौष्टिक तृणधान्य लागवडीसाठी कृषी विद्यापीठांमार्फत विविध योजना तयार करायला हव्यात; त्याचबरोबर उद्योगांना या व्यवसायाशी निगडित करायला हवे. शेतकऱ्यांसाठी राज्य व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे. पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे, पौष्टिक तृणधान्य पिकांची मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, पौष्टिक तृणधान्य पिकांचा लोकांच्या आहारात वापर वाढवणे, त्यासाठी प्रचार व प्रसार करणे, तृणधान्याचा विविध योजनांत समावेश करणे या गोष्टी केल्या पाहिजेत. सरकार जेव्हा काही करील, तेव्हा करील; परंतु सामान्य नागरिकांनीही आता पुढे येण्याची गरज आहे. ‘मी आठवड्यातून एकदा तरी तृणधान्याचे- कडधान्याचे सेवन करीन,’ अशी प्रतिज्ञा केली पाहिजे, तरच तृणधान्य वाचेल. पर्यायाने माणूस वाचेल यात शंका नाही.

ॲड क्षमा आशिष धर्मपूरीवार 

अध्यक्ष बाल कल्याण समिती चंद्रपूर

8484082224.

No comments:

Post a Comment

व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी

  Valentine's week or saptpadi    व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी मी हा जो लेख  लिहिलाय हे माझे व्यक्तिगत/वयक्तिक मत आहे त्यामुळे कुणाला...