बालक-पालक आणि हरवलेला संवाद
संवाद म्हणजे आदान - प्रदान, देवाण - घेवाण, संप्रेषण, संज्ञापन इत्यादी. थोडक्यात संवाद म्हणजे आपल्या मतांचे केलेले आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय.
आज प्रत्येक पालकाने अंतर्मुख होऊन एका प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. मी माझ्या भूमिकेत (आई/बाबा ) म्हणून बेस्ट आहे का? आणि नसेल तर नेमका प्रॉब्लेम काय आहे. एक प्रॉब्लेम तर प्रकर्षाने जाणवतोय तो म्हणजे आजच्या धका धकीच्या जीवनात संवादाची भासत असलेली उणीव.खरचं संवादाची जागा आता सोशल मीडिया आणि मोबाईलने घेतली,संवाद हरवत गेला आणि प्रत्येकाच्या मध्ये होणारी विचारांची, बोलण्याची देवाण घेवाण सुटत गेली.
पूर्वी जेव्हा मोबाईल, इंटरनेट नव्हता तेव्हा आई-वडील, आजी आजोबा मुलाला /नातवंडांना बागेत खेळायला घेऊन जायचे मुले खेळायची आणि मोठी मंडळी गप्पा मारत बसायची पण आता मात्र तसे होताना दिसत नाही.आता छोटं बाळ चेंडूशी खेळत राहतो, झोक्यावर बसत आपले मन रमवत राहतो.आई-वडील मात्र आपापल्या मोबाईलमध्ये व्यग्र असतात. ना एकमेकांशी संवाद होतो ना आनंदी आठवणी तयार होतात. यातून कुटुंबातले मानसिक स्वास्थ्य हरवते एवढं नक्की. आणि मग मुलं देखील आईवडिलांचे बघून तसं अनुकरण करू पाहतात आणि मग अशावेळी आई वडिलांनी मुलाला मोबाईल हाताळताना टोकले की,ते देखिल उद्धटपणे उत्तर देतात की,तुम्ही तर मोबाईल मध्ये राहता दिवसभर मग मात्र अशा वेळेला पालक निरुत्तर होतात. म्हणूनच मोबाईल मधला आणि प्रत्यक्षात साधलेला संवाद यात किती फरक असतो हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
मूल जन्माला येऊन मोठं होईपर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पालकांचं मुलांसोबतचं नातं बदलत असतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर तर पालक बालक होतात नि बालक पालक होतात. या वेगवेगळ्या टप्प्यातील पालकत्वाच्या, म्हणजेच आई-बाबापणाच्या गूजगोष्टी सांगणारं हा लेख आहे असे म्हणायला हरकत राहणार नाही.
पुर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती त्यामुळे घर कसे माणसांनी गजबजलेले असायचे तिथे आजी आजोबा, काका काकू, त्यांची मुलं असा भरपूर लोकं असणारा परिवार असायचा.त्यामुळे घरात कुणी ना कुणी बोलणारं असायचेच. पूर्वी चुलीवर स्वयंपाक व्हायचा आता चुलीवरच्या जेवणासाठी लोकं हॉटेल मध्ये जावून जेवण करतात, पुर्वी एकत्र खाली बसून जेवणावळी व्हायच्या, टीव्ही देखील सगळे मिळून एकत्र बसून पाहणे, सगळ्या स्त्री मंडळी मिळून गप्पा मारत कामं आटोपायच्या मात्र आता तो आनंद पूर्णपणे संपत चाललाय.
आता मी हा तुमच्याशी संवाद च साधते आहे असं समजुया आणि आता आपण गप्पा मारायला सुरुवात केलीच आहे तर तुम्हाला आईबाबांची गंमत सांगू… जसे आपल्या वयाचे टप्पे असतात, कप्पे असतात तसे आपल्या आईबाबापणाचेही टप्पे असतात, वळणं असतात. प्रत्येक ठिकाणी आपलं रूप, आपलं अस्तित्व बदलतं. तसं बदलायलाच हवं. तान्ह्या लहानग्यांचे आईबाबापण, शाळेची पहिली पायरी चढण्यापासून ते शाळा संपेपर्यंतच्या मुलांचं आईबाबा असणं, तरुण मुलांचं आईबाबा असणं, आपापल्या संसारात दंग झालेल्या मुलांकडे फक्त बघणारं आईबाबापण आणि शेवटी आपण मूल होतो नि मुलं पालक होतात ते आईबाबापण... प्रत्येक वळणावर जगण्याचा वेगळा गंध असतो आणि असतोच तो! अडचणी, प्रश्न, समस्या, भूमिकेतला गोंधळ, हे सारं असणारच. त्याशिवाय मजा काय? दरवेळी हेच असतं असं नाही. आपण मात्र मानत जातो आपल्याला खूप प्रश्न आहेत. आपणच त्यात गुंतत जातो. मनाला आपल्या त्रास आणि आपण त्रासलेलं पाहून समोरच्याला त्रास! आपली अस्वस्थता, आपल्यावर आलेला ताण... म्हणजे छोट्याशा घरावरचं मळभ. बघता बघता हे मळभ दाट होतं नि घराचं आयुष्य काळवंडून जातं. हे सारं दूर होऊन घराचं जगणं स्वच्छ-निरभ्र व्हावं असं वाटतं ना?
परवा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते. खरं म्हणजे मी खूप कार्यक्रम वगैरे जात नाही, जाते पण लिमिटेड. आणि तिथे गेले की बरेच ओळखीचे आणि अनोळखी पालकही ही भेटतात या पालक गटाशी माझा फार जवळून संबंध नाही. पण समिती मध्ये पालक आले की,मात्र जवळुन संबंध येतो.सगळ्यांच्या डोळ्यात मुलांबद्दलची स्वप्नं गच्च भरून असतात. मुलांसाठी वाट्टेल ते आणि वाट्टेल तितकं! हे सर्वच पालक सामान्यतः करतात. चाळीस-पंचेचाळीस वयामधले आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असलेले पालक मुलांसाठी ‘वाट्टेल ते - वाट्टेल तेवढं’ करायला तयार असतात.(‘घ्या’ पण मुलाला यश मिळवून ‘द्या’ असं म्हणणारे). त्यातल्या त्यात एक ओळखीचे आईबाबा भेटले. ‘दहावीनंतर सायंटिस्ट व्हायचं म्हणतेय मुलगी असे त्यांनी मला सांगितले मी त्यांना विचारले ‘किती फी?’ ‘दोन वर्षांची तीन लाख,’ त्यांनी अगदी शांतपणे सांगितलं. ‘काय?’ असं मी शॉक बसल्यासारखं विचारलं. तर ‘ही फी खूप कमी आहे आणि इथे सुट्याही देतात. त्यामुळे मुलांना इतरही काही करता येतं. अगदीच चरकाला जुंपली जात नाहीत.’ दोघंही समाधानी होते. यातही दोन अपेक्षा पूर्ण झाल्याचं समाधान होतं. एक म्हणजे मुलीला हवं असणारं करिअर आणि दुसरं म्हणजे इतरही काही करता येणं. ही देखील अपेक्षाच होती. मुलगीही बरोबर होती. तिलाही काही टेन्शन नव्हतं. माझ्या लक्षात आलं आता ही स्पर्धा मुलांनाही हवीहवीशी वाटू लागलीय आणि मुलांना आपल्या पालकांच्या आर्थिक सुबत्तेची जाणीव आहे. माहिती आहे ढवळाढवळ करत नाहीत.
मग प्रश्न येतो कुठे? प्रश्न आहे मनातल्या उगाचच केलेल्या काळजीचा! मुलांबद्दलच्या विश्वासाचा. एवढा खर्च करतोय. काय काय कानावर येतं! बाहेर नीट असतील ना? कसल्या कसल्या सवयी नसतील ना? मित्रमंडळ कोण असेल? आपण कुणाकुणाकडे चौकशी करतो, कधी मेसेजेस बघतो. एका अर्थाने आपल्याच मुलांबद्दल (विशेषतः तरुणाईतल्या) आपल्याला अविश्वास वाटतो. कारण काय असेल? ह्या अविश्वासाचा जन्म शंका, कुशंका, कुणाचं काहीतरी ऐकलेलं पाहिलेलं यातून होतो. आपल्या मनात एवढंच असतं, सगळं काही नीट व्हावं. एवढं सगळं ज्या मुलांसाठी मिळवलंय ते सार्थक व्हावं. मुलं लहान होती तेव्हा ठीक होतं. आता मुलं तरुण झालीत. याचं मनातून टेन्शन येतंय. सतत पुढच्या क्षणाची भीती. काय होईल?
ह्याच काय होईल ह्या भितीत न जगता आई वडिलांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधून चर्चा करणे महत्वाचे आहे. आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठविताना त्यांनी कसे इतरांपासून सावध राहायला हवे, कुणाच्याही भुल थापाना बळी पडू नये,आपले संस्कार, संस्कृती,धर्म याबद्दल जागरूक करणे गरजेचे आहे.
हा क्षण का आला? आई-बाबा! याचं कारण आपलं एकमेकांशी बोलणंच थांबलं. आपण थांबवलं का? नाही. आपण काळाबरोबर झालेले बदल खूप उथळपणे लक्षात घेतले. समजून घ्यायचे राहिलेच. कुणीतरी सांगितलं, अशा मुलांबरोबर मित्रासारखे वागा. म्हणजे नक्की कोणती सीमारेषा असावी, हे काही ठरवलंच नाही ना! इतर कसे ठरवतील? आपणच ती ठरवायची. खांद्यावर हात टाकणे, ए बाबा, मॉम म्हणणं, व्हॉटस्अपवर भेटणं एवढ्यापुरतंच मित्रत्व का? का हे वयाचं मित्रत्व! आपण तरुण होणं नि मुलांनीही आपल्या वयाचा शोध घेणं ही संवादाची दिशा होती का? दोन पिढ्या वेगळ्या न राहता, आमचा भूतकाळ आणि मुलांचा वर्तमान-भविष्य ह्यांची सतत टक्कर नाही ना होत? आमची तरुणाई आणि मुलांची तरुणाई यांच्यात संवाद होतो का? आमच्या विचारांत संवाद होतो का? मुलांचं मत असंच नि आमचं मत अनुभवाचं. म्हणून इगो का? आधुनिकतेशी आमचा संवाद होतो का? सगळंच काही जुळणार नाही. मतभेद हवेतच, पण मनभेद नकोत. आपापल्या मतांचा आदर करत आणि जपत आपलं मुलांबरोबरचं जगणं संवादरूप झालं तर किती छान?
मला वाटतं जेव्हा जेव्हा नवीनता समजून घेण्यात मी कमी पडते, विचार मागे पडतात तेव्हा तेव्हा माझी तरुण मुलंच(बहिणींची, नंदांची मुलं मुली)आणि माझा मुलगा मला दिशा देतात, सावरतात, आधार देतात, मला शांत करतात. तेव्हा मी मनातल्या मनात ह्या घरातल्या तरुणाईला थँक्स देते. ह्या माझ्या तरुण मुलांनी मला विचारांचं नवं भान दिलंय. काही विचार ऐकून मी दचकते. काही विचार पचायला जड असतात, काही विचार माझा ताण हलका करणारे असतात. संवादाच्या ह्या नव्या वाटा! मनातला अविश्वास कमी होऊ लागतो. कारण मुलांबद्दलच्या ह्या आपल्याला वाटणाऱ्या अविश्वासाने मुलांनाही त्रास होतो, राग येतो. आणि बोलणंच संपतं. आपण घाबरतो. कारण मनात भीती असते काही बरं-वाईट केलं तर!
आणि मुलांशी नातं, संवाद, मोकळेपणा, स्वातंत्र्य जिथे आहे त्यांच्याबाबतीत! कितीतरी घरं अशी आहेत की मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना इतरांच्या मर्जीप्रमाणे जगावं लागतं, कुढावं लागतं, खाली मान घालून ऐकावं लागतं. अशाही विचारांचा एक गट आहेच की आईबाबांचा. नि तशाही विचारांचा आहे. यांच्यातही संवाद घडवून आणायलाच हवा ना? त्यासाठीच कधी लहान मुलांचे आईबाबा असणार आहोत, तर कधी मुलं आपली पालक होणार आहेत. बघू या संवाद कसा पुढे जातोय ते.
बघा पटतय काय माझे आणि होवू द्या मग बालकं आणि पालकांमध्ये मनसोक्त संवाद
ॲड क्षमा बासरकर
अध्यक्ष बाल कल्याण समिती चंद्रपूर
8484082224