गुरुपौर्णिमा
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते.आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे 'गुरुपौर्णिमा.' या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत व त्यांना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे. व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात.महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो.ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो.
यंदा गुरुपौर्णिमा शुक्रवार, 23 जुलै रोजी आली आहे. या दिवशी मंदिरांमध्ये मोठा उत्सव असतो. तसंच विद्यालयांसह,महाविद्यालय,नृत्य, संगीत, चित्रकला यांसारख्या विविध कलांचे ज्ञान देणाऱ्या गुरुंची भेट घेऊन त्यांना वंदन करतात. यंदा कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणावर गुरु पौर्णिमा साजरी करता येणार नसली तरी सोशल मीडियाद्वारे आपल्या गुरुंना शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेचा दिवस खास करता येऊ शकतो.कारण कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागलेत आणि २सऱ्या कोरोनाच्या लाटेत बऱ्याच जवळच्या लोकांना गमावल्याने आता तरी सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.
आपल्या संस्कृतीत गुरु-शिष्याची मोठी परंपरा असून गुरुला साक्षात परब्रह्म म्हटलं आहे. त्याचबरोबर ग्रंथ, पुस्तके यांनाही गुरुंचा दर्जा आहे. आपल्याला ज्ञानार्जन करणारी, मार्ग दाखवणारी व्यक्ती, तसेच पुस्तकाला देखील गुरुस्थानी मानावे.आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चालायला बोलायला लागला की,त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे 'मातृदेवो भव:पितृदेवो भव: असेही म्हटले जाते. तसेच अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.
शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माचं कारण काय ह्याचेच मार्गदर्शन करणारे गुरु.तसेच नौकरी, व्यवसायात देखील प्रत्येकाला गुरू हे असतातच आणि त्यांचा आपल्याला घडविण्यात खूप मोठा वाटा असतो.आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत. उदा :महर्षी व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी,अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ,सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील.
गुरु म्हणजे परीस
आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
करोना आणि गुरुपौर्णिमा
सध्या करोनामुळे शाळा महाविद्यालये बंद होती. आता काही वर्ग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या कठीण काळातही अनेक मार्गदर्शक आपल्याला लाभले ज्यामुळे या काळात आपल्याला धीर मिळाला, प्रसंगावधान राखत वाईट परिस्थितीत अनेक जण योग्य दिशा दर्शक ठरले. त्यामुळे काही टक्यांनी का नसो या कठीण परिस्थितीवर मात करणं, भिती घालवणं शक्य झालं आहे. अजुनही काही नियमांत राहणं गरजेचं असलं तरी आपल्यातली भिती कमी होते आहे हे मात्र नक्की. त्यामुळे पदोपदी मार्गदर्शक ठरलेल्या प्रत्येक गुरुला शतश: नमन🙏
No comments:
Post a Comment