मोबाईलच्या पडद्यामागील वास्तव आणि ढासळती बालसुरक्षा*
आजच्या डिजिटल युगात विज्ञान‑तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुलभ केले असले, तरी त्याचबरोबर अनेक गंभीर सामाजिक प्रश्नही उभे केले आहेत. अलीकडे प्रसारमाध्यमांतून समोर आलेल्या दोन धक्कादायक घटनांनी संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत गडचिरोली जिल्ह्यातील पालकांच्या मजुरीसाठी पोटासाठी झगडणाऱ्या एका दहा वर्षांच्या चिमुकल्याने काळीज पिळवटून टाकणारी जीवनयात्रा संपवली. या घटना केवळ बातम्या न राहता समाजाच्या सामूहिक अपयशाचे प्रतीक ठरतात.
*समाजाची भूमिका*
समाज हा केवळ प्रेक्षक न राहता सजग व संवेदनशील असणे अत्यंत आवश्यक आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे ‘हे आपल्याशी संबंधित नाही’ अशा दृष्टिकोनातून पाहणे हीच सर्वात मोठी चूक आहे. संशयास्पद हालचाली, बालकांवरील अन्याय, शोषण किंवा मानसिक ताण दिसून येत असल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेला कळवणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे. सामाजिक गप्पांपेक्षा सामाजिक हस्तक्षेपाची गरज आज प्रकर्षाने जाणवते.
*पालक व परिवाराची जबाबदारी*
पालक हे मुलांचे पहिले गुरु आणि रक्षक असतात. केवळ शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देणे पुरेसे नसून मुलांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांशी मोकळा संवाद, त्यांच्या भीती‑तणावांना समजून घेणे, त्यांना विश्वासात घेणे ही काळाची गरज आहे. अनेक वेळा मुले आपले दुःख व्यक्त करू शकत नाहीत; अशावेळी पालकांची संवेदनशीलता जीवनरक्षक ठरू शकते.
मोबाईलचा वापर : गरज की घातक सवय?
मोबाईल फोन आज जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र लहान वयातच अनियंत्रित मोबाईल वापर मुलांच्या भावविश्वावर गंभीर परिणाम करतो. अश्लील, हिंसक किंवा चुकीच्या आशयापर्यंत सहज पोहोच ही मोठी धोक्याची घंटा आहे. पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे, योग्य वयोगटानुसार माहिती उपलब्ध करून देणे आणि ‘डिजिटल शिस्त’ लावणे अत्यावश्यक आहे. मोबाईल हा साधन म्हणून वापरावा, सवय म्हणून नव्हे—ही जाणीव समाजाने स्वीकारली पाहिजे.
*शासन व यंत्रणांची भूमिका*
बालसंरक्षणासाठी कायदे अस्तित्वात असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी तितकीच महत्त्वाची आहे. शाळा, अंगणवाडी, सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यास अशा घटना रोखणे शक्य आहे. समुपदेशन केंद्रे, हेल्पलाईन आणि बालस्नेही वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
आज घडणाऱ्या या दुर्दैवी घटना आपल्याला आरसा दाखवतात. ‘मुलं म्हणजे भविष्य’ हे वाक्य केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता कृतीत उतरवण्याची गरज आहे. समाज, पालक, परिवार आणि शासन—सर्वांनी मिळून जबाबदारी स्वीकारली तरच बालसुरक्षित, संवेदनशील आणि सुदृढ समाजाची उभारणी होऊ शकते. अन्यथा मोबाईलच्या पडद्यामागे लपलेले हे वास्तव आणखी भयावह होत जाईल.
ॲड क्षमा बासरकर-धर्मपुरिवार
अध्यक्ष बाल कल्याण समिती चंद्रपूर
८४८४०८२२२४
No comments:
Post a Comment