देश हा समृद्धीचा
देश आपला भारत देश, कितीतरी विविधतेने नटलेला आहे,म्हणजे होता,आहे आणि पुढेही तो तसाच राहणार.खरचं मला खूप अभिमान वाटतो की, मी भारताची नागरीक आहे.आपल्या कडे निसर्ग म्हणा,संत महात्मे म्हणा की ज्ञान,विज्ञान, कला क्षेत्र म्हणा सगळ्या गोष्टीनी असा पारंगत आहे,आपला भारत देश.म्हणूनच तर परकीय देशातील लोकं आपल्या कडे आले की, अश्या विविधतेने नटलेल्या भारताकडे बघून त्यांना खूप अप्रूप वाटतं. त्यांना आपली,गाणी,सणं, पेहराव,संस्कृती याचं खूप नवल वाटतं इतकंच काय तर ते आपल्या संस्कृत भाषेतील श्लोक सुद्धा म्हणायला तत्पर असतात.इतका सुंदर आणि समृद्ध अश्या भारताला आपल्याला आणखी सुंदर आणि समृद्ध बनवायचा आहे कारण आपल्या भारतात लोकशाही असल्यामुळे सगळेच नागरिक सुजाण आहेत,त्यामुळे आपणच आपल्या भारताला समृद्ध बनवायला हवे, सुंदर बनवायला हवे. हो की, नाही बरोबर ना. आपणच ती वाटचाल सुंदर बनऊ शकू.
भारतीयासाठी दुसरा भारतीय परका नाही. ' विविधतेत एकता ' ही आपल्या देशाची हजारो वर्षांची परंपरा राहिली आहे. आपण भारतवासी आहोत म्हणजे काय आहोत? संयोगाने या देशात जन्म घेतला म्हणून केवळ आपण भारतवासी नाही. ही केवळ नागरिकतेशी संबंधित बाब नाही. भारताच्या भूमीवर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती ' भारतपुत्र ' आहे. या मातृभूमीची निस्सीम भक्ती करणे त्याचं काम आहे.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे,भारतात भरपूर समृद्धी होती व आहे . त्यामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी कोणाशीही संघर्ष करावा लागला नाही. स्वाभाविकच आपण या दृष्टिकोनातच वाढलो की, भारतात समृद्धी भरपूर आहे, आपण त्याचा उपयोग करत आहोत, आपले जीवन समृद्ध करत आहोत. कोणी येत आहे तर ठीक आहे, तुम्हीही या आमच्याबरोबर राहा भाषा, पंथ, संप्रदाय यांची विविधता तर पहिल्यापासूनच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत बनतात, राजकीय विचारप्रवाहांत मतभेद पहिल्यापासून आहेतच, परंतु या विविधतेत आपण सगळे भारतमातेचे पुत्र आहोत हे आधी लक्षात घ्यायला हवे आणि आपापल्या विविधतेच्या वैशिष्ट्यांवर ठाम राहून, दुसऱ्या च्या विविधतेचा सन्मान करता आला पाहिजे.आणि त्यांनी त्यांच्या विविधतेवर ठाम राहावे या दृष्टिकोनाचे आपण स्वागत केले पाहिजे.आपण सगळेच भारतमातेचे पुत्र आहोत. आपआपली मते काहीही असोत, पण आपण हे स्वीकारून पुढे चालत आहोत की, अंतिमत: आपण सगळे मिळून भारताचे भाग्य बदलू. ' भारताला समृद्ध बनवू ' या एकाच ध्येयासाठी वेगवेगळे रस्ते पत्करणाऱ्या लोकांनी, आपली विविधता तिच्या वैशिष्ट्यांसह घेऊन पुढे चालावयास हवे. त्याने आपले सामाजिक जीवन समृद्ध होते. विविधता असणे, हे सुंदरतेचे व समृद्धतेचे लक्षण आहे. त्याचा स्वीकार करत आपण चालत आहोत. या भावनेचे भान राखत, आपण सगळे एक आहोत, याचंही दर्शन वेळोवेळी होणे गरजेचे आहे. कोणत्याही राष्ट्राचे भाग्य बनविणारे समूह नसतात, व्यक्ती नसतात, विचार तत्त्वज्ञान नसते, सरकार नसते. सरकार खूप काही करू शकते, मात्र सगळेच करू शकत नाही. देशातील सामान्य समाज जोपर्यंत गुणसंपन्न बनत नाही, आपल्या अंतःकरणातून भेदांना तिलांजली देत नाही. मनातील सगळे स्वार्थ हटवून, देशासाठी पुरुषार्थ करावयास तयार होत नाही, तोपर्यंत देशाचे भाग्य बदलू शकत नाही.
स्वातंत्र्यापूर्वी मागास राष्ट्रांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारताने त्यानंतरच्या साठ वर्षात नेत्रदीपक म्हणावी अशी प्रगती केली आहे.देश स्वातंत्र्य झाला तेव्हा आपल्याकडे देशवासीयांना पुरवता येईल एवढे अन्नही नव्हते. म्हणून नंतर डॉ. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती घडविण्यात आली. त्यामुळे उत्पादन वाढले आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आज दुष्काळ पडला तरी उपासमारीने गरीब मरतील अशी स्थिती नाही. हे हरीतक्रांतीचे यश आहे. म्हणूनच आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख हा वाढतोच आहे आणि तो असाच वाढत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना म्हणून म्हणेन "मेरा भारत महान"जय हिंद .
कायदा सुरक्षा की बंधन
एखाद्या समाजामध्ये सुरक्षेचा प्रश्न जेव्हा मोठा होतो, सामान्य नागरिकांना जिथे सुरक्षित वाटत नाही, तिथे प्रश्न हा पोलिसांचा नसून त्या समाजाच्या एकूणच स्वास्थ्याचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजाच्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे बघताना समाजाची वीण अधिक घट्ट कशी होईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच कशी कमी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
भारतामधली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या श्रुंखलेमधली प्रत्येक कडी कमकुवत आहे. कायदा बनवण्यापासून, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आणि कायदा न पाळणारे आहेत त्यांना शिक्षा होईपर्यंत प्रत्येक पायरीमध्ये दोष आहेत.
भारतामध्ये जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा न करता नवीन कायदे बनविण्याकडे कल दिसतो. त्यामुळे कायदे हे कमकुवत झालेले असतात आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नाही. कायदेच कमकुवत असल्यामुळे गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाणही कमी होते. या सगळ्याचा एकत्रित आणि कोणत्याही शासनव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक परिणाम म्हणजे यामुळे एकूणच कायद्यावरचा विश्वास आणि न्यायव्यवस्थेवरची सामान्य जनतेची श्रद्धा कमी होते.आणि त्यामुळेच लोकं त्या कायद्याचा गैरवापर करायला पण मागे पुढे पाहत नाहीत ही आजची स्थिती झालेली आहे.
एका नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच दोन बाजू कायद्याला पण असतात म्हणजे बघा ना एक बाजू चांगली म्हणता येईल तर दुसरी बाजू वाईट.म्हणजे काही वेळेला कायदा हा चांगला आणि सुरक्षित असला तरी काही वेळेला तोच कायदा काहीजणांसाठी बंधनकारक आणि असुरक्षित पण राहू शकतो.म्हणूनच कायदा जितका सुरक्षित आहे तितकाच काही वाईट लोकांच्या वागणुकीमुळे त्यालाही वाईट केलाय असे म्हणायला हरकत नाही.कायदा हा सुरक्षेसाठीच केला गेलाय पण त्याचाही काही प्रमाणात गैरउपयोग होतो त्यावेळेला वाईट वाटतं.
म्हणजे बघा कलम ४९८ अ भारतीय दंड संहिता नुसार एखाद्या स्त्रीला तिच्या नवऱ्याने किंवा त्याच्या घरच्यांनी शारिरीक किंवा मानसिक त्रास दिला तर त्याकरिता शिक्षा आहे.म्हणजे एका दृष्टीने महिलांना अशाप्रकारे त्रास झाला तर त्यांच्या संरक्षणासाठी असे कायदे करण्यात आलेले आहेत तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ असा सुद्धा कायदा करण्यात आलेला आहे.या कायद्यामुळे महिलांना सुरक्षा तर मिळतेच आणि हिम्मत देखील,पण या कायद्याचा गैरवापर सुद्धा केल्या जातो अनेकदा काही महिला याचा गैरवापर करतात म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी त्या विनाकारण स्वतःच्या नवऱ्याचा आणि त्यांच्या घरच्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने देखील खोटी केस केल्या जाते.तसेच भां.द.वी. चे कलम ३७६ बलात्काराच्या सुद्धा केसेस बऱ्याच वेळेला खऱ्या असतात पण काही वेळेला इथे सुद्धा कायद्याचा दुरुपयोग केला जातो त्याचं खूप वाईट वाटतं कायदा हा सुरक्षेसाठी केलेला असताना सुद्धा जर त्याचा दुरुपयोग केला जात असेल तर त्या सारखी दुसरी वाईट गोष्ट नाही.याच गोष्टी वरून एक किस्सा आठवला,मी असाच एक लेख स्त्रियांवर लिहिला होता तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला फोन केला आणि मला म्हणाली की,क्षमा तू लेख खूपच छान लिहिलास, पण माझी तुला एक विनंती आहे की,तू एक लेख पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारा वर देखील लिही सगळेच कायदे स्त्रियांकरिता आहेत पण काही वेळेला पुरुषांना पण महिला फसवू शकतात आणि हे ऐकून मला वाईट वाटले म्हणून मी तिला विचारले असता तिने सांगितले की,तिच्या मावस भावासोबत असेच काहीतरी घडले म्हणजे त्याने त्याच्या बायकोला काहीच म्हटलेले नसताना तिने त्याला आणि त्याच्या घरच्यांना त्रास देण्याच्या हेतूने चुकीची केस केली आणि त्यामुळे तिच्या भावाला खूप मनस्ताप सहन करावा लागला आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली खूप वाईट वाटले म्हणजे बघा कायदा सुरक्षेसाठी असतो पण त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो.
नंतरच्या काळात तांत्रिक क्रांती झाली. सायबर विश्व आणखी प्रगत झाले. अलीकडील काळात व्हॉटस्अप,फेसबुक, इमेल यातून परस्परसंबंध विस्तारत गेले. अशा वेळी एका मित्राने दुसऱ्या मित्राला इमेल पाठवले, तर त्यातील मजकूर ईमेल चालवणाऱ्या कंपनीला वाचता येईल का किंवा पोलिसांना परस्पर नकळत ते शोधता येईल का, हा खाजगीपणाचा प्रश्न आला. पूर्वी आपण पत्र लिहायचो तसेच ते आता इमेल, व्हॉटस्अप, फेसबुकवर लिहितो. कंपन्या किंवा सरकार हस्तक्षेप करून ते पत्र किंवा त्यातील मजकूर वाचणार असतील तर ते खाजगी हक्का वर गदा आणण्यासारखे नाही का, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. कंपन्या किंवा सरकार असे करत असल्यास त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात काहीही कारण नसताना केलेली ढवळाढवळ होत नाही का, व्यक्तींमधील संवाद, इमेलची देवाणघेवाण वाचली जाणार असेल तर ती खाजगी कशी राहाणार, असे हे प्रश्न आहेत. तसेच हे प्रश्न उपस्थित करतानाच यासंदर्भात काही बंधने आवश्यक आहेत का,हाही प्रश्न आहेच.
काही प्रमाणात बंधने ठेवावी लागतील.
असे असले तरी यासंदर्भात काही बंधने असावी लागतील. कारण, समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीची खोटी बदनामी करणारा मेसेज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध (आजच्या भाषेत व्हायरल) केला. तर अशा प्रकरणामध्ये सदर व्यक्तीने मागणी केल्यास हा मेसेज कुठून आला होता हे शोधण्याचा अधिकार राहील. यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा नव्हे तर स्वतःचे खाजगी आयुष्य जपण्याचा अधिकार वापरता येईल. ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये याचा समावेश होऊ शकणार नाही अशी तरतूद करावी लागेल.
दुसरी गोष्ट म्हणजे, समजा कुणी तक्रार दाखल केली नसेल, पण एखादे राष्ट्रविरोधी कृत्य केले जात असेल तर,उदाहरणार्थ, व्हॉटस्अप किंवा सोशल मीडियावरून समाजविघातक, चिथावणी देणारा मेसेज पाठवला जात असेल तर सरकारला स्वतःहूनही यामध्ये लक्ष घालता येईल. तसेच फौजदारी गुन्हा घडत असताना ती कंपनी किंवा सरकार यांना त्याचे मूळ शोधून काढण्यासाठी सर्व मेसेजेस वाचता येतील. मात्र, याचा अर्थ केलेली कृती गुन्हा आहे, विघातक आहे, दुसऱ्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे, असे आढळले तरच अशाप्रकारे शोध घेता येईल. सरसकट सर्व ई-मेल, व्हॉटस्अपच्या मेसेजेसमध्ये सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणजेच खाजगी जीवनातील करार, मदार, कौटुंबिक संपर्क, खाजगी पत्रे हा व्यक्तीच्या खाजगी जीवनाचा भाग असेल आणि तो सायबर कायद्यामध्येही अबाधित राहिला पाहिजे. असे न केल्यास सामान्य माणसाचा खाजगीपणाचा अधिकार काढून घेणे होईल. थोडक्यात, एखाद्याची तक्रार असेल, कुणावर तरी अन्याय झालेला असेल, देशहितासाठी, देश संरक्षणासाठी गरजेचं असेल तेव्हा राईट ऑफ प्रायव्हसीचा अधिकार पुढे करून बचाव करता येणार नाही. अशी बंधने मान्य करावी लागु शकतात.
सायबर गुन्हे कायद्यात अचानकच एखादी व्यक्ती मेसेज पाठवतो. इमेलवरसुद्धा खोटे आयडी तयार केले जातात. त्यावरून तिसऱ्या व्यक्तीला धमकावणारा मेसेज जातो. जेव्हा न्यायालयात हा खटला येतो तेव्हा मी हा इमेल केला नव्हता असे झाले की, न्यायालय त्या इमेलच्या मुळाशी जाण्याचे निर्देश देते. मग तो कुठून आला ते शोधणे या ठिकाणी निश्चितच परवानगीयोग्य असेल.या ना अशा आनेक घटना घडत असतात म्हणूनच जिथे गरज असेल तिथे कायद्याचे संरक्षण म्हणून उपयोग व्हायलाच हवा पण जर व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर जर घाला घालणारा समाज असेल तर तिथे काही प्रमाणात बंधने देखील आवश्यक होऊन जातात.
ऍड.सौ.क्षमा आशिष धर्मपुरीवार
बालन्याय मंडळ सदस्य
चंद्रपूर,फोन न.८४८४०८२२२४
No comments:
Post a Comment