Sunday, March 7, 2021

मोकळा श्वास फुलराणीचा(स्त्रीचा)

 मोकळा श्वास फुलराणीचा(स्त्रीचा-बलिकांचा)


सर्वप्रथम माझ्या सगळ्या फुलराणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐


हिरवेहिरवे गार गालिचे

हरित तृणांच्या मखमालीचे

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती...


आज अजूनही २१ व्या शतकात फुलराणी(स्त्री)ही मोकळा श्वास घेऊ शकते काय हो?आजही स्त्रियांच्या बाजूने निर्माण केलेले असंख्य कायदे, संघटना, उपक्रम या स्त्रीवादी कायद्यांच्या मखमलीवर ही फुलराणी नक्की खेळत आहे की, जळत आहे, असा प्रश्न तितक्याच आवेशाने उभा राहतो. 

स्वतंत्र भारतात तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल महिलांची प्रगती आणि त्यांच्या अधिकारांवर बोलताना. तसेच त्यांचा सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी "महिला दिवस"आणि "जागतिक महिला दिवस" साजरा केला जातो. 8 मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिवस साजरा केला जातो. चला पाहूया 8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा का केला जातो.


1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने एक घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिला जागतिक महिला दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. यानंतर सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तसेच 19 मार्चला पहिल्यांदा ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झरलँडमध्येही जागतिक महिला दिवस साजर केला गेला.दोन वर्षानंतर 1913 मध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.


जरी स्त्रिया आज मोठया मोठया पदावर काम करीत असल्या, अगदी राजकारणापासून ते भारतीय सेनेपर्यंत तिने आपली मजल मारली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र तिच्यावर असलेली कुटुंबाची स्वयंपाक घरातील अग्नी तेवत ठेवायची जबाबदारी कायम आहेच. सती बळीची जागा हुंडाबळीने घेतली. गर्भजल परीक्षण, विनयभंग, बलात्कार अशा अनेक रुपाने स्त्रिया आजही सती जात आहेत. आजची परिस्थिती पाहता असे वाटते की, मग स्त्री सुधारणावादी कायद्यांनी केले काय? तर केवळ अन्याय अत्याचाराचे मुखवटे बदलले आणि स्त्री बाबतचा पारंपरिक दृष्टिकोन, तिचा छळ, अपमान कायम राहिला. स्त्रियांच्या बाजूने असंख्य कायदे, संघटना असल्या तरी तिचे प्रश्न कायम आहेत. निष्ठावान विवाहित स्त्रियांचे   प्रश्न आहेत. घटस्फोट घेतला नाही तर छळ आहे,प्रेम मान्य केले तर ठीक,नाही तर फुलराणीला जळणे आहे. म्हणजे स्त्रियांच्या बाजूने मखमालीचे कायदे असले तरी ती वेगवेगळ्या रुपाने ती जळतेच आहे.फुलराणी म्हणजे आपल्याच लेकी सुना हो,जेव्हा प्रत्येकाच्या फुलराणीला घरी यायला उशीर होतो, तेव्हा  लागेना डोळ्याशी डोळा-काय जाहले फुलराणीला?अशी भीती मनात बसलेली असते म्हणजे लेकी सुना वेळेत घरी आल्या नाही की जीवात जीव नसतो,एकीकडे भाषणातून स्त्रियांबद्दलचे आदराचे शब्द, तिच्या कामगिरीचे शब्द, कौतुकाचे शब्द गायीले जात असले तरी ते मात्र प्रत्यक्षात हे सर्व भाषणापुरतेच राहतं.अजूनही स्त्री(फुलराणी) ही मोकळा श्वास पूर्णपणे घेऊच शकत नाही.


 मोबाईल इंटरनेट ने तर अश्लिलतेचा कळसचं गाठला अहे. आणखीन किती निर्भया, फुलराणी निर्माण होतील काय माहीती.शासनाचे अशा गुन्ह्यांबाबत लवचिक धोरण यामुळे प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या आधाशी नजरा टपलेल्या असतात. ना नात्याचा, ना वयाचा,ना माणुसकीचा विचार केला जातो. त्या नराधमांना हवी असते ती शिकार फक्त शिकार आणि म्हणून अनेक चिमुरड्यादेखील उमलण्याच्या आधीच खुडत आहेत.


 बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा नुसता हवेत नको तर प्रत्येकाच्या अंतरंगात असणे गरजेचे आहे. या देशात घडत असलेल्या घटना पाहताना "बेटी कैसे बचाएंगे"हाच मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा असतो. एकतर्फी प्रेम, जबरदस्तीचे प्रेम, आपल्याला न मिळालेले प्रेम, दुसऱ्याला देखील मिळू देणार नाही, अशा संस्कारांचा आपला देश नाही. मग का होत आहे हे सगळे? आपली संस्कृती बदलत चालली आहे? त्यामागे प्रेम असते, दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधायचे असते. हे विचार गेले तरी कुठे?स्त्री ही कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, पत्नी, मुलगी असते. या सर्व भूमिकेतून आपल्या पुरुष असलेल्या मुलास, भावास व पतीस पुढे जाऊन सांगावे लागेल की,जसा आमचा मान राखतोस तसा आमच्या सारख्या स्त्रियांचादेखील मान राख.आता ही जबाबदारी देखील स्त्रियांवरच आली आहे. अशी भावना जर प्रत्येक मुलाने ठेवली तर अश्या गुन्ह्यांवर बऱ्याच प्रमाणात आळा बसेल नाही काय?म्हणूनच मग आई जशी मुलीला बाहेर जाताना समजावून सांगते चांगल्या वागणुकीबद्दल तसेच चार शब्द आईनेच बाहेर जाणाऱ्या आपल्या मुलाला देखील सांगायला हवे की, स्त्री किंवा परक्या मुलीकडे वाईट नजरेने बघू नकोस म्हणून.


जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने महिलांचे एकत्रिकरण, सबलीकरण, आदरीकरण, आनंद, उत्साह, पारितोषिके, सन्मान, गौरव, पुरस्कार यामुळे दरवर्षी महिला दिन प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा वाटतो. मरगळलेल्या स्त्रीत्वाला एक उजाळा देण्यासाठी हा दिवस प्रेरक ठरतो.पण हे केवळ या एकाच दिवसापुरते मर्यादित नसावे. आपल्या नात्यातील पुरुष वर्गाला जर स्त्रीविषयक चांगले संस्कार मिळाले तर निश्चितच हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या, मारहाण, शिवीगाळ,पुरुषप्रधान संस्कृतीतील मुस्कटदाबी थांबण्यास निश्चितच हातभार लागेल. या महिला दिनाच्या दिवशी एक आशा करूया की,ही  फुलराणी जळणार नाही तर खुलणारी, खेळणारी असेल आणि मग त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत राहील,आनंदी राहील.आताही या कोरोना महामारीच्या संकटात देखील स्त्री डगमगली नाही प्रत्येक क्षेत्रात तीने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केले मग ती फुलराणी सबला नाही काय?बालकवींच्या हिरवे हिरवे गार गालिचे या कवितेच्या ओळींचा अर्थ सार्थकी लागेल.म्हणूनच आपल्या या फुलराणीला म्हणावेसे वाटते-


जीत पक्की है

कुछ करना है, तो डटकर चल।

थोड़ा दुनियां से हटकर चल।

लक पर तो सभी चल लेते है,

कभी इतिहास को पलटकर चल।

बिना काम के मुकाम कैसा ?

बिना मेहनत के, दाम कैसा ?

जब तक ना हाँसिल हो मंज़िल

तो राह में, आराम कैसा ?

अर्जुन सा, निशाना रख, मन में,

ना कोई बहाना रख।

जो लक्ष्य सामने है,

बस उसी पे अपना ठिकाना रख।

सोच मत, साकार कर ,

अपने कर्मो से प्यार कर।

मिलेंगा तेरी मेहनत का फल,

किसी और का ना इंतज़ार कर।

जो चले थे अकेले 

उनके पीछे आज कई लोगो के मेले हैं ।


ऍड. सौ.क्षमा आशिष बासरकर-धर्मपुरीवार

बा क. स. अध्यक्ष  चंद्रपूर. 8484082224

2 comments:

मोबाईलच्या पडद्यामागील वास्तव आणि ढासळती बालसुरक्षा

 मोबाईलच्या पडद्यामागील वास्तव आणि ढासळती बालसुरक्षा*  आजच्या डिजिटल युगात विज्ञान‑तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुलभ केले असले, तरी त्याचबरोबर अ...