स्त्री हा शब्दच इतका सुंदर आहे की,तिच्या किती सुंदर छटा असू शकतात याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.स्त्री जीवनातील प्रत्येक अवस्था ही खरंच खूपचं अनोखी असते.
आमच्या घरी सगळ्यांनाच गोड खाण्याचे अतिशय वेड आहे काहीना ना काही गोड चालूच असतं पण काल परवा ह्यांनी(अहोंनी)येताना आम्रखंड आणले आणि सहज विचार करताना सुचलं की,दही हे दुधापासून बनतं त्या दह्यापासूनच श्रीखंडही बनतं हे सगळ्यांना माहितीच आहे. मग स्त्री जशी महत्वाची असते तर स्त्री सुद्धा ह्या दुधासारखी असते असे म्हणायला हरकत नाही नाही काय?बघा ना त्या दुधापासून जसे ,दही,ताक, लोणी,तूप बनतं तश्याच ह्या म्हणजे स्त्री जीवनातील वेगवेगळ्या रंगछटा असू शकतात खरयं की, नाही तर ह्या स्त्रियांच्या रंगछटा कशा असू शकतात ते थोडक्यात बघूया, बघा आवडतंय काय?
स्त्रियांच्या सुंदरछटा
"दूध,दही,ताक,लोणी,तूप" हे लक्षात आल्यावर असे वाटले की, अरे ह्या तर सर्वच स्त्री जीवनाच्या अवस्था आहेत असं मला वाटतं, आता तुम्ही ठरवून मला सांगायचे आहे होय की नाही ते.बघूया कसे ते..?
"दूध"
दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:- कुमारिका जीवन निर्मल, शुद्ध म्हणून देवाची पण पूजा करताना पाण्यात दूध घालून देवाला अंघोळ घालतात कारण आपण त्याला शुद्ध मानतो खरंय ना,दूध म्हणजे माहेर,दूध म्हणजे आईवडिलांशी असलेलं शुभ्र,सकस,निर्भेळ असं नातं की,ज्यात स्वार्थाचं पाणी टाकून त्या दुधाला वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं म्हणूनच त्यावेळी तिला तीचं ते जग सुद्धा दुधा सारखे स्वच्छ ,सुंदर,निर्भेळ आणि निरागस दिसतं.
"दही"
म्हणजे नववधू.दही सुद्धा शुद्धच बरं का कारण दही सुद्धा पंचामृतामध्ये देवाचं तीर्थ म्हणून वापरल्या जातं तर तेही शुद्धच नाही का? कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू होते.दुधाचं नाव बदलून दही होतं!तसंच कुमारिकेचे ही लग्नानंतर नाव बदलल्याच जातं तर तिथे तिची पण अवस्था बदलते आणि ती भावनिक दृष्ट्या घट्ट होते जसे दुधाला विरजण घातले की दही बनून ते दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं जशी नववधू दुसऱ्या घरी गेली की घट्ट होते.लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत दह्या सारखी थिजून राहते. दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. बऱ्याच मुली ह्या कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी स्त्री त्याच्याप्रती खूपच निष्ठा दाखवते होय ना का तर नवरा हा "पती परमेश्वर" असतो म्हणून ?नाही तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं दह्यासारखं.खरंय ना.दह्याचं पुढे जाऊन ताक बनतं तर या ताकाचं स्त्री शी काय साम्य जुळतंय बघूया.
"ताक"
दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. आणि मग ते घट्ट नातंच पुढे मुलींना संसार सुखाचा करण्यास नक्कीच मदत होते.
सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते,म्हणजे "ताक" होतं."दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी."ताक हे अतिशय बहुगुणी असतं असं आयुर्वेदात म्हटलंय.
म्हणूनच घरातल्यांचा स्वभाव जसे की,सासू सासरे असो ननंद असो की,नवरा प्रत्येकाची स्वभाव प्रकृती ही वेगळीच असते कुणाचा बडबडा( वात प्रकृती )तर कुणाचा रागीष्ट(पित्त प्रकृती)अश्या प्रकृतीवर ताक हे फारच गुणकारी असते.ताक दोघांनाही शांत करतं.यांवर उत्तम उपाय आहे असं आयुर्वेद म्हणतो.
"ताक" म्हणजे सुनेचं सासरच्यांशी असलेलं नातं.सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय असते. तिथे दुधाचा उपयोग होत नाही.
दूध' पाणी घालून बेचव होतं पण 'ताक' मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नावर कामी येतं.ताकाला घुसळल्यानंतरच मऊ लोणी तयार होतं.
"लोणी"
लोणी म्हणजे अनेक वर्षे लग्नाला होऊन गेल्यानंतरही नवरा,बायको आणि मुलांकरिता आईच्या प्रेमामधला रेशमी सहवास असतो.ताकाला घुसळल्यानंतरच मऊ लोणी तयार होतं होय ना,अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.मग अनेक वर्षांनी जेव्हा माझ्या संसाराचे फलित काय असा प्रश्न ताक विचारतं तेव्हा,मऊ,रेशमी,मुलायम,नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो हेच त्या ताकाचे फलित नाही काय.
हे लोणी म्हणजे नवऱ्याशी आणि मुलांसोबत असलेलं स्त्रीचं सुंदर नातं.रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण न कण 'लोणी' होऊन हळूच बाजूला जमा होत असतात.हेच तर ते त्या सुंदर नात्याचं फलित असतं.
"तूप"
लोणी' ही तिची(स्त्रीची)अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.लोणी कढवून तूप तयार होतं तसंच लोणी जसं आपलं रूप बदलतं .तसंच स्त्री देखील नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं "साजूक तूप होतं".
मग ते साजूक तूप वरणभात असो,शिरा असो किंवा पुरणपोळी असो त्यावर पळीभर साजूक तूप पडलं की, जादूच घडते.
देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात घातलेली वात बघितली की, घरासाठी येता जाता हात जोडणारी आपल्या घरासाठी त्या म्हातार अवस्थेतही गेल्यावर सुध्दा घरासाठी झटणारी चंदेरी केसांची आजी दिसते.
घरासाठी,कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे 'तूप' संपून जातं.हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय असे मला वाटते.
"दूध ते तूप"
हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. "स्री आहे तर "श्री" आहे हे म्हणनं वावगं ठरूं नये."
"असा हा स्री चा संपूर्ण प्रवास न थांबणारा,सतत धावणारा,न कावणारा,न घाबरणारा,कुटूंबासाठी झिजणारा,कुटूंबाची काळजी घेणारा" ह्या प्रवासास तथा "स्त्री "जातीस मानाचा मुजरा.
ऍड. क्षमा आशिष बासरकर-धर्मपुरीवार.
सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.
8484082224
सुंदर लेख ����
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख,
ReplyDelete