Friday, October 1, 2021

वृद्धापकाळ एक बालपण

                           वृद्धापकाळ एक बालपण


वृद्धापकाळ एक बालपण असेच म्हणेन मी,लहान मुलांना जसे सांभाळावे लागतं तसेच वृद्धांना पण सांभाळावं लागतं म्हणूनच वृद्धापकाळ हे बालपणासारखंच असतं,कारण वृद्धापकाळ हा अगदी लहान मूलांच्या बालपणासारखा होऊन जातो म्हणजे जसं जसं म्हातारपण येतं तसे तसे ते  हट्टी, जिद्दी,चिडचिडे होतात आपण कितीही समजावले तरीही ते लहान मुलांसारखेच वागतात😊ते पुन्हा सुरवातीच्या पायरीवर पोहचतात.जसं बालपण असतं हट्टी, जिद्दी मी म्हणेन तेच खरं असं होऊन जातो वृद्धापकाळ,म्हणजे कुणी मुद्दाम नाही करत पण ते त्या त्या वयात गेले की, ते आपोआप घडत जातं मग मात्र अशावेळेला दोन्ही बाजू मध्ये(नवीन आणि जुन्या पिढी)मध्ये सामंजस्य असणं अत्यंत आवश्यक आहे....वृद्धापकाळ हा जीवनातील विविध अंतरंगातील घटक असून प्रत्येकांना या काळाचा अनुभव घेणे नियतीने निश्चित केलेले आहे. नशिबाने वृद्धत्व जगणे हे अपरिहार्य असले तरी या काळातही जीवन आनंदी, उत्साही व निरामय ठेवणे शक्य असते मात्र, यासाठी विद्यमान पिढीने जेष्ठांचे ऋण स्वीकारण्याचे कर्तव्य बजावले आणि वृद्धांनी देखील आजच्या पिढीला समजून घेतले तर वृध्दाश्रमासारख्या संस्कृतीला स्वीकारण्याची गरजच भासणार नाही. तथापी नव्या पिढीत ऋणांची परतफेड करण्यात दिवसागणिक अभाव जाणवत असल्याने आज वृद्धाश्रम हि काळाची गरज व वृद्धांच्या दुःखांवर पाखरण करणारे मोलाचे निवासस्थान ठरले आहे.  वर्तमान व भावी पिढीने आजच्या या अनुभवातून बोध घेत आदर्श कुटुंब व नीतीवान समाजाच्या निर्मितीचा पाया रचावा. वृद्धांचा आदर - सत्कार हा आपला धर्म असून त्यांचे रक्षण व काळजी घेणे हि आपली संस्कृती आहे. त्यांचा मान - सन्मान समाजातील सर्व घटकांनी राखावा.

वृद्धत्व चांगले जावे हे आपल्या हातात असते. वृद्धत्व म्हणजे विकास आणि म्हातारपण म्हणजे झीज असते. वार्धक्य हे सक्रियपणे जगले पाहिजे. निवृत्त झालो म्हणजे आता उर्वरित जीवनभर आराम करायचा हा दृष्टीकोन ठेवता कामा नये.ज्येष्ठांना माया व प्रेमाची अपेक्षा कुटुंबीयांनी पूर्ण करणे अपेक्षित असतानाच परिस्थितीशी जुळवून घेणे, पुरेसा व्यायाम, व्यस्तता व सामाजिक कामे हे चार मुद्दे ज्येष्ठांच्या सुरक्षित व निरोगी जीवनासाठी उपयोगी ठरतात. नातवंडांवर संस्कार व समाजसेवा या दोन जबाबदाऱ्या त्यांच्यासाठी अधिक आनंददायी ठरतात. अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे (Senior citizen) कोणीही लक्ष देत नाही, ही बाब मात्र ज्येष्ठांसाठी निराशादायक ठरते. एकत्र जेवण, पुरेसा संवाद व काळजी घेण्याची कुटुंबातील सदस्यांची सवय त्यांना आधार देणारी ठरते. एकलकोंडेपणाने नैराश्य वाढते. पण घरातील सर्व सदस्य धावपळीत असले तरी त्यांनी साधलेला संवाद, विचारपूस त्यांना कायम ऊर्जा देणारी ठरते. स्वतःला व्यस्त ठेवणे अत्यंत आवश्यक बाब ठरते. त्यामध्ये सामाजिक काम, करमणूक, बागकाम, संगीत, वाचन, लेखन, धार्मिक कार्य अशा अनेक कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याची गरज वृद्धापकाळात असते. याशिवाय समवयस्क मित्रासोबत गप्पाटप्पादेखील तेवढ्याच आनंददायी ठरतात. ही व्यस्तता शारीरिक व्यायाम घडवून आणते तसेच मनाला कामांत गुंतवून ठेवते. कुटुंबासोबत व परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची तयारी असणेदेखील आवश्यक असते. मनाचा उत्साह भरपूर असला तरी शरीर साथ देत नाही. तेव्हा ही स्थिती समजून घेत परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे.तसेच गरजेपुरता व्यायाम केल्यास अन्न पचवणे व शरीर निरोगी राहण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.

वृद्ध लोक देखील कधीतरी तरुणाईची पायरी पार करतच वृद्धापकाळापर्यंत पोहचलेले असतात पण म्हणतात ना त्यांच्या पिढीत नी आपल्या पिढीत फरक असतो तो तोच असतो त्यालाच आताच्या भाषेत(generation gap)म्हणूयात आपण, कारण आताचे तरुणाईचे विचार जरा वेगळे असतात आणि पूर्वीच्या लोकांचे विचार वेगळे असायचे.

आता हेच बघा ना पूर्वीचे लोक रात्री वेळेत झोपतात, सकाळी लवकरच उठतात,फिरायला जाणे,देवासाठी फुले तोडून आणणे,रोज देवाची नित्यनियमित पूजा करणे, मंदिरात जाऊन प्रदक्षिणा मारणे, वेळेत जेवण करणे,म्हातारपणी नवरा बायको ला जास्त मदत करत असतात कारण त्यांना तेव्हा जाणवतं की,आपणच आता एकमेकांचे सोबती असतो,मग झाडांना पाणी घालणे, बायकोला कुठलीही घरात मदत लागत असेल तर ती करणे हे त्यांचे नित्यक्रम सुरू असतात. रोज संध्याकाळी देखील फिरायला जाणे कुणीही रस्त्यात भेटले की,आपुलकीने चौकशी करणे, नमस्कार करणे असे सगळे नेम त्यांचे ठरलेले असतात. तसेच वृद्ध स्त्री देखील अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेताचाच स्वयंपाक करते,उरलेले गरिबाला किंवा गायीला खाऊ घालणे किंवा स्वतः दुसऱ्या दिवशी शिळं खातील पण अन्न वाया जाऊ देणार नाही,तसेच आलेल्या गेलेल्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे पाहुणचार करणे, सगळी सणं साधेपणाने साजरे करणे,पैशाची काटकसर करणे अशी ही जुनी मंडळी ज्याला आपण Senior citizen म्हणतो, पण खरं सांगा हे मी त्यांचे जितके नीत्यनियम सांगितले यात काय गैर आहे हो, सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्याच आहेत पण आजच्या पिढीला ते नको असतं आणि त्यामुळेच जुन्या आणि नवीन पिढी मध्ये वाद होतात.

आजकालची मुलं शिक्षण घेतात आणि आईवडिलांना भारतात ठेवून स्वतः विदेशात जाऊन राहतात पण सांगा फोनवरून, लॅपटॉप वरून आईवडिलांना मुलांचे प्रेम मिळतं काय हो,विदेशात जाऊन खूप पैसे कमवतात आणि इकडे भारतात आई वडिलांना भरपूर पैसे पाठवून मोकळे होतात पण असे केल्याने कर्तव्य संपले नाही काय मुलामुलींचे? "पैशाने प्रेम विकत घेता येत नाही"जिव्हाळा हा जिव्हाळच असतो तो असा ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून किंवा वर्षातून एकदा भेटल्यानी मिळेल काय हो! ज्या वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केले,आपल्याला नवीन कपडे  घेऊन स्वतः फाटक्या बनियन घालून दिवस काढलेत, चप्पल तुटली तर ती शिवून घातली, जुना झालेला चष्मा तुटला तरी नवीन न घेता चिकटवून वापरला,त्या काळी कुठे हॉटेल्स आणि कुठले विकेंड असायचे पण आपल्या आईने आपल्याला वेगवेगळी पदार्थ घरीच करून खाऊ घातलेत ना,उन्हाळा आला की,घरीच पापड, शेवया, घरीच मसाला कुटणे असे सगळे प्रकार करून तिने  आपल्यासाठी मेहनत घेतलेली असतेच ना,म्हणूनच दोन्ही पिढीने सांजयस्याने वागले तर समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारे आणि समोरच्याची काळजी घेणारे जीवन प्रत्येकालाच जगता येईल. आणि कुठेही वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही.आणि ज्यांनी आपल्याला नवी उमेद दिली त्यांची उमेद आपण त्यांच्या वृद्धापकाळात खचू देता कामा नये नाही काय!

                               Happy senior citizens day 🙏

ऍड. क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.




No comments:

Post a Comment

व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी

  Valentine's week or saptpadi    व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी मी हा जो लेख  लिहिलाय हे माझे व्यक्तिगत/वयक्तिक मत आहे त्यामुळे कुणाला...