Wednesday, December 2, 2020

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

                     माणसाने माणसाशी माणसासम वागणे

माणूस,माणूस म्हटला की, त्यासोबत स्वार्थ हा शब्द part and parcel असतोच नाही काय?माणसाने किती स्वार्थी असायला हवे याची पण काही मर्यादा असायला हवी.काही जण या जगात निःस्वार्थी पण आहेत हो.पण खरंच आजची परिस्थिती बघितली की, चीड येते खूप,तळपायाची आग मस्तकात जाते.

व्यक्तीला/माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांच्या मनाला येईल तसे बोललेच पाहिजे जरुरी नाही ना पण नाही "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणची भीती" असेच वागतात काही लोक.समाज माध्यमांवर तर इतक्या पोस्ट येत असतात की, असं वाटतं सडेतोड उत्तर द्यावे त्यांच्या बोलण्यावर पण काय शेवटी तेच ना की,आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला मग.अरे पूर्वीचे लोक वाईट वागले म्हणून त्याची शिक्षा ज्याच्यापरी तो समाज भोगतच आहे की,पण आता कुठे तसं राहिलंय समाज बदलला व्यक्तीच्या भावना आणि वागणूक बदलली तरीही व्यक्ती मधला तिढा काही केल्या सुटत नाही.का माणूसच माणसाच्या जीवावर उठलेला दिसतो अरे स्वतःच्या स्वार्थापोटी आणखी किती स्वार्थी व्हाल.

आता पर्यंत हिंदू मुस्लिम वाद चालायचा तो जगमान्यच आहे.तो वाद विकोपाला गेलेला आहे आणि तो तिढा कधी सुटणार देवच जाणे पण आता हिंदू हिंदू सुद्धा भांडायला लागलेत किती ती घाणेरडी वृत्ती झाली आहे लोकांची,अरे कधी माणसं माणसांना समजून घेतील.प्रत्येक जण आपल्या लढ्यासाठी लढतोच त्यात काही नवल आहे काय पण मला म्हणायचंय की,स्वतः लढताना दुसऱ्या समाजावर चिखल फेकण्यापेक्षा तुमचे लढण्याचे ध्येय काय हे बघायला हवे.सत्ता,मानसन्मान हवा असला की, कुठल्याश्या पक्षाचा आधार घेऊन सगळा उपभोग घ्यायचा बरं एवढ्यावर माणूस थांबतो काय,त्याची भूक कुठे क्षमलेली असते त्याची भूक अजून वाढलेली असते,पण जेव्हा भूक वाढल्यावर काहीच मिळत नाही तेव्हा व्यक्ती दुसऱ्याला दोष द्यायला पण कमी जास्त बघत नाही काही महान लोक तर अक्षरशः एका proper समाजाची जात काढायला मागे पुढे बघत नाही, मग आता कोण जातीयवाद पसरवतो आहे आणि का म्हणून, अरे तुम्हाला तुमचा हक्क मिळत नाही म्हणून तुम्ही एखाद्या जातीला किती बदनाम करण्याचा प्रयत्न कराल किती नीच आणि घाणेरडी वृत्ती झाली आहे माणसाची,त्यात राजकीय पक्षाला पण ओढल्या जातं.

आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट अशी म्हण मराठीत प्रचलित आहे.हीच म्हण सध्या हिंदू समाजामध्ये मराठी मराठी लोकांमध्ये घडून येताना दिसतंय.अरे प्रत्येकाचेच हक्काची लढाई ही असतेच ना लढा ना कोण नाही म्हणतंय पण दुसऱ्यावर चिखलफेक न करता लढा म्हणावं. म्हणूनच म्हणावं वाटतं माणसाने माणसाशी माणसासम वागणे.


ऍड. क्षमा आ.बासरकर- धर्मपुरीवार.

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.

फोन न.८४८४०८२२२४

Wednesday, November 4, 2020

देश हा समृद्धीचा- कायदा सुरक्षा की बंधन

                                     देश हा समृद्धीचा

देश आपला भारत देश, कितीतरी विविधतेने नटलेला आहे,म्हणजे होता,आहे आणि पुढेही तो तसाच राहणार.खरचं मला खूप अभिमान वाटतो की, मी भारताची नागरीक आहे.आपल्या कडे निसर्ग म्हणा,संत महात्मे म्हणा की ज्ञान,विज्ञान, कला क्षेत्र म्हणा सगळ्या गोष्टीनी असा पारंगत आहे,आपला भारत देश.म्हणूनच तर परकीय देशातील लोकं आपल्या कडे आले की, अश्या विविधतेने नटलेल्या भारताकडे बघून त्यांना खूप अप्रूप वाटतं. त्यांना आपली,गाणी,सणं, पेहराव,संस्कृती याचं खूप नवल वाटतं इतकंच काय तर ते आपल्या संस्कृत भाषेतील श्लोक सुद्धा म्हणायला तत्पर असतात.इतका सुंदर आणि समृद्ध अश्या भारताला आपल्याला आणखी सुंदर आणि समृद्ध बनवायचा आहे कारण आपल्या भारतात लोकशाही असल्यामुळे सगळेच नागरिक सुजाण आहेत,त्यामुळे आपणच आपल्या भारताला समृद्ध बनवायला हवे, सुंदर बनवायला हवे. हो की, नाही बरोबर ना. आपणच ती वाटचाल सुंदर बनऊ शकू.

भारतीयासाठी दुसरा भारतीय परका नाही. ' विविधतेत एकता ' ही आपल्या देशाची हजारो वर्षांची परंपरा राहिली आहे. आपण भारतवासी आहोत म्हणजे काय आहोत? संयोगाने या देशात जन्म घेतला म्हणून केवळ आपण भारतवासी नाही. ही केवळ नागरिकतेशी संबंधित बाब नाही. भारताच्या भूमीवर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती ' भारतपुत्र ' आहे. या मातृभूमीची निस्सीम भक्ती करणे त्याचं काम आहे.

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे,भारतात भरपूर समृद्धी होती व आहे . त्यामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी कोणाशीही संघर्ष करावा लागला नाही. स्वाभाविकच आपण या दृष्टिकोनातच वाढलो की, भारतात समृद्धी भरपूर आहे, आपण त्याचा उपयोग करत आहोत, आपले जीवन समृद्ध करत आहोत. कोणी येत आहे तर ठीक आहे, तुम्हीही या आमच्याबरोबर राहा भाषा, पंथ, संप्रदाय यांची विविधता तर पहिल्यापासूनच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत बनतात, राजकीय विचारप्रवाहांत मतभेद पहिल्यापासून आहेतच, परंतु या विविधतेत आपण सगळे भारतमातेचे पुत्र आहोत हे आधी लक्षात घ्यायला हवे आणि आपापल्या विविधतेच्या  वैशिष्ट्यांवर ठाम राहून, दुसऱ्या च्या विविधतेचा सन्मान करता आला पाहिजे.आणि त्यांनी त्यांच्या विविधतेवर ठाम राहावे या दृष्टिकोनाचे आपण स्वागत केले पाहिजे.आपण सगळेच भारतमातेचे पुत्र आहोत. आपआपली मते काहीही असोत, पण आपण हे स्वीकारून पुढे चालत आहोत की, अंतिमत: आपण सगळे मिळून भारताचे भाग्य बदलू. ' भारताला समृद्ध बनवू ' या एकाच ध्येयासाठी  वेगवेगळे रस्ते पत्करणाऱ्या लोकांनी, आपली विविधता तिच्या वैशिष्ट्यांसह घेऊन पुढे चालावयास हवे. त्याने आपले सामाजिक जीवन समृद्ध होते. विविधता असणे, हे सुंदरतेचे व समृद्धतेचे लक्षण आहे. त्याचा स्वीकार करत आपण चालत आहोत. या भावनेचे भान राखत, आपण सगळे एक आहोत, याचंही दर्शन वेळोवेळी होणे गरजेचे आहे. कोणत्याही राष्ट्राचे भाग्य बनविणारे समूह नसतात, व्यक्ती नसतात, विचार तत्त्वज्ञान नसते, सरकार नसते. सरकार खूप काही करू शकते, मात्र सगळेच करू शकत नाही. देशातील सामान्य समाज जोपर्यंत गुणसंपन्न बनत नाही, आपल्या अंतःकरणातून भेदांना तिलांजली देत नाही. मनातील सगळे स्वार्थ हटवून, देशासाठी पुरुषार्थ करावयास तयार होत नाही, तोपर्यंत देशाचे भाग्य बदलू शकत नाही.

स्वातंत्र्यापूर्वी मागास राष्ट्रांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारताने त्यानंतरच्या साठ वर्षात नेत्रदीपक म्हणावी अशी प्रगती केली आहे.देश स्वातंत्र्य झाला तेव्हा आपल्याकडे देशवासीयांना पुरवता येईल एवढे अन्नही नव्हते. म्हणून नंतर डॉ. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती घडविण्यात आली. त्यामुळे उत्पादन वाढले आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आज दुष्काळ पडला तरी उपासमारीने गरीब मरतील अशी स्थिती नाही. हे हरीतक्रांतीचे यश आहे. म्हणूनच आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख हा वाढतोच आहे आणि तो असाच वाढत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना म्हणून म्हणेन "मेरा भारत महान"जय हिंद .


                            कायदा सुरक्षा की बंधन

एखाद्या समाजामध्ये सुरक्षेचा प्रश्न जेव्हा मोठा होतो, सामान्य नागरिकांना जिथे सुरक्षित वाटत नाही, तिथे प्रश्न हा पोलिसांचा नसून त्या समाजाच्या एकूणच स्वास्थ्याचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजाच्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे बघताना समाजाची वीण अधिक घट्ट कशी होईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच कशी कमी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

भारतामधली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या श्रुंखलेमधली प्रत्येक कडी कमकुवत आहे. कायदा बनवण्यापासून, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आणि कायदा न पाळणारे आहेत त्यांना शिक्षा होईपर्यंत प्रत्येक पायरीमध्ये दोष आहेत.

भारतामध्ये जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा न करता नवीन कायदे बनविण्याकडे कल दिसतो. त्यामुळे कायदे हे कमकुवत झालेले असतात आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नाही. कायदेच कमकुवत असल्यामुळे गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाणही कमी होते. या सगळ्याचा एकत्रित आणि कोणत्याही शासनव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक परिणाम म्हणजे यामुळे एकूणच कायद्यावरचा विश्वास आणि न्यायव्यवस्थेवरची सामान्य जनतेची श्रद्धा कमी होते.आणि त्यामुळेच लोकं त्या कायद्याचा गैरवापर करायला पण मागे पुढे पाहत नाहीत ही आजची स्थिती झालेली आहे.

एका नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच दोन बाजू कायद्याला पण असतात म्हणजे बघा ना एक बाजू चांगली म्हणता येईल तर दुसरी बाजू वाईट.म्हणजे काही वेळेला कायदा हा चांगला आणि सुरक्षित असला तरी काही वेळेला तोच कायदा काहीजणांसाठी बंधनकारक आणि असुरक्षित पण राहू शकतो.म्हणूनच कायदा जितका सुरक्षित आहे तितकाच काही वाईट लोकांच्या वागणुकीमुळे त्यालाही वाईट केलाय असे म्हणायला हरकत नाही.कायदा हा सुरक्षेसाठीच केला गेलाय पण त्याचाही काही प्रमाणात गैरउपयोग होतो त्यावेळेला वाईट वाटतं.

म्हणजे बघा कलम ४९८ अ भारतीय दंड संहिता नुसार एखाद्या स्त्रीला तिच्या नवऱ्याने किंवा त्याच्या घरच्यांनी शारिरीक किंवा मानसिक त्रास दिला तर त्याकरिता शिक्षा आहे.म्हणजे एका दृष्टीने महिलांना अशाप्रकारे त्रास झाला तर त्यांच्या संरक्षणासाठी असे कायदे करण्यात आलेले आहेत तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ असा सुद्धा कायदा करण्यात आलेला आहे.या कायद्यामुळे महिलांना सुरक्षा तर मिळतेच आणि हिम्मत देखील,पण या कायद्याचा गैरवापर सुद्धा केल्या जातो अनेकदा काही महिला याचा गैरवापर करतात म्हणजे स्वतःच्या  फायद्यासाठी त्या विनाकारण स्वतःच्या नवऱ्याचा आणि त्यांच्या घरच्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने देखील खोटी केस केल्या जाते.तसेच भां.द.वी. चे कलम ३७६ बलात्काराच्या सुद्धा केसेस बऱ्याच वेळेला खऱ्या असतात पण काही वेळेला इथे सुद्धा कायद्याचा दुरुपयोग केला जातो त्याचं खूप वाईट वाटतं कायदा हा सुरक्षेसाठी केलेला असताना सुद्धा जर त्याचा दुरुपयोग केला जात असेल तर त्या सारखी दुसरी वाईट गोष्ट नाही.याच गोष्टी वरून एक किस्सा आठवला,मी असाच एक लेख स्त्रियांवर लिहिला होता तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला फोन केला आणि मला म्हणाली की,क्षमा तू लेख खूपच छान लिहिलास, पण माझी तुला एक विनंती आहे की,तू एक लेख पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारा वर देखील लिही सगळेच कायदे स्त्रियांकरिता आहेत पण काही वेळेला पुरुषांना पण महिला फसवू शकतात आणि हे ऐकून मला वाईट वाटले म्हणून मी तिला विचारले असता तिने सांगितले की,तिच्या मावस भावासोबत असेच काहीतरी घडले म्हणजे त्याने त्याच्या बायकोला काहीच म्हटलेले नसताना तिने त्याला आणि त्याच्या घरच्यांना त्रास देण्याच्या हेतूने चुकीची केस केली आणि त्यामुळे तिच्या भावाला खूप मनस्ताप सहन करावा लागला आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली खूप वाईट वाटले म्हणजे बघा कायदा सुरक्षेसाठी असतो पण त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो.

नंतरच्या काळात तांत्रिक क्रांती झाली. सायबर विश्व आणखी प्रगत झाले. अलीकडील काळात व्हॉटस्अप,फेसबुक, इमेल यातून परस्परसंबंध विस्तारत गेले. अशा वेळी एका मित्राने दुसऱ्या मित्राला इमेल पाठवले, तर त्यातील मजकूर ईमेल चालवणाऱ्या कंपनीला वाचता येईल का किंवा पोलिसांना परस्पर नकळत ते शोधता येईल का, हा खाजगीपणाचा प्रश्न आला. पूर्वी आपण पत्र लिहायचो तसेच ते आता इमेल, व्हॉटस्अप, फेसबुकवर लिहितो. कंपन्या किंवा सरकार हस्तक्षेप करून ते पत्र किंवा त्यातील मजकूर वाचणार असतील तर ते खाजगी हक्का वर गदा आणण्यासारखे नाही का, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. कंपन्या किंवा सरकार असे करत असल्यास त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात काहीही कारण नसताना केलेली ढवळाढवळ होत नाही का, व्यक्तींमधील संवाद, इमेलची देवाणघेवाण वाचली जाणार असेल तर ती खाजगी कशी राहाणार, असे हे प्रश्न  आहेत. तसेच हे प्रश्न उपस्थित करतानाच यासंदर्भात काही बंधने आवश्यक आहेत का,हाही प्रश्न आहेच.


काही प्रमाणात बंधने ठेवावी लागतील. 

असे असले तरी यासंदर्भात काही बंधने असावी लागतील. कारण, समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीची खोटी बदनामी करणारा मेसेज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध (आजच्या भाषेत व्हायरल) केला. तर अशा प्रकरणामध्ये सदर व्यक्तीने मागणी केल्यास हा मेसेज कुठून आला होता हे शोधण्याचा अधिकार राहील. यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा नव्हे तर स्वतःचे खाजगी आयुष्य जपण्याचा अधिकार वापरता येईल. ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये याचा समावेश होऊ शकणार नाही अशी तरतूद करावी लागेल.


दुसरी गोष्ट म्हणजे, समजा कुणी तक्रार दाखल केली नसेल, पण एखादे राष्ट्रविरोधी कृत्य केले जात असेल तर,उदाहरणार्थ, व्हॉटस्अप किंवा सोशल मीडियावरून समाजविघातक, चिथावणी देणारा मेसेज पाठवला जात असेल तर सरकारला स्वतःहूनही यामध्ये लक्ष घालता येईल. तसेच फौजदारी गुन्हा घडत असताना ती कंपनी किंवा सरकार यांना त्याचे मूळ शोधून काढण्यासाठी सर्व मेसेजेस वाचता येतील. मात्र, याचा अर्थ केलेली कृती गुन्हा आहे, विघातक आहे, दुसऱ्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे, असे आढळले तरच अशाप्रकारे शोध घेता येईल. सरसकट सर्व ई-मेल, व्हॉटस्अपच्या मेसेजेसमध्ये सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणजेच खाजगी जीवनातील करार, मदार, कौटुंबिक संपर्क, खाजगी पत्रे हा व्यक्तीच्या खाजगी जीवनाचा भाग असेल आणि तो सायबर कायद्यामध्येही अबाधित राहिला पाहिजे. असे न केल्यास सामान्य माणसाचा खाजगीपणाचा अधिकार काढून घेणे होईल. थोडक्यात, एखाद्याची तक्रार असेल, कुणावर तरी अन्याय झालेला असेल, देशहितासाठी, देश संरक्षणासाठी गरजेचं असेल तेव्हा राईट ऑफ प्रायव्हसीचा अधिकार पुढे करून बचाव करता येणार नाही. अशी बंधने मान्य करावी लागु शकतात.

सायबर गुन्हे कायद्यात अचानकच एखादी व्यक्ती मेसेज पाठवतो. इमेलवरसुद्धा खोटे आयडी तयार केले जातात. त्यावरून तिसऱ्या व्यक्तीला धमकावणारा मेसेज जातो. जेव्हा न्यायालयात हा खटला येतो तेव्हा मी हा इमेल केला नव्हता असे झाले की, न्यायालय त्या इमेलच्या मुळाशी जाण्याचे निर्देश देते. मग तो कुठून आला ते शोधणे या ठिकाणी निश्चितच  परवानगीयोग्य असेल.या ना अशा आनेक घटना घडत असतात म्हणूनच जिथे गरज असेल तिथे कायद्याचे संरक्षण म्हणून उपयोग व्हायलाच हवा पण जर व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर जर घाला घालणारा समाज असेल तर तिथे काही प्रमाणात बंधने देखील आवश्यक होऊन जातात.


ऍड.सौ.क्षमा आशिष धर्मपुरीवार

बालन्याय मंडळ सदस्य

चंद्रपूर,फोन न.८४८४०८२२२४






Tuesday, November 3, 2020

नवरंग नवरात्रीचे

 बघा आवडतंय काय  👇🙏    


                           नवरंग नवरात्रीचे

मागच्या वर्षी नवरात्री मध्ये मी स्वतः नवरात्रीचे नवरंगाच्या साड्यांचे फोटो fb वर टाकून रंगाचे महत्व सांगितले होते पण यावर्षी कोरोनामुळे सगळ्यांचा उत्साहाचं मावळलाय आणि त्यातल्या त्यात सध्या ह्या cyber crime मुळे आता फोटोस टाकायची पण भीती वाटते असो पण मागच्या वर्षी फोटोस टाकले होते तर कोणी चांगले आणि कोणी वाईटही बोलले होते. या गोष्टीची खंत आहे की, स्त्री आहे म्हणून तिला मानसन्मान दयायचा नाही द्यायचा नाही तिची खिल्ली उडवायची,का बरं तिला प्रत्येक वेळेला कमीच लेखल्या जातं,खरं तर आज स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही पण तरीही स्त्रियां वरील अत्याचाराचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नाही.म्हणजे आज एक बलात्काराची बातमी कानावर पडली की, लगेच दोन दिवसांनी पुन्हा कुठली तरी बलात्काराची बातमी ऐकायला येते जणू काही त्या नराधमांना त्याचे कृत्य पाहून यालाच बळ येतं असं वाटतं आणि अशा बातम्या कानावर पडल्या की, तळपायाची आग मस्तकात जाते.मला ह्यातून हेच सांगावेसे वाटते की,स्त्री ही आज कुठल्या ही क्षेत्रात कमी नाही तर तिचा योग्य मानसन्मान हा व्हायलाच हवा.


खरंय देवीचे नवरात्र आले की,एक प्रकारचा आनंद,उत्साह संचारतो.आपल्या पैकी अनेक जणांना कोणता रंग कधी घालायचा त्याचा वार आणि तारीख याची यादी नवरात्र सुरू व्हायच्या आधीच आपल्याला मिळालेली असते आणि आपण त्याची सगळी तयारी देखील केलेली असते. होय ना...?

चला तर मग या वर्षी आपण सगळेच जण जरा वेगळ्याच नवरंगाची उधळण करूया तुम्हाला हे नवरंग आवडतात काय बघा


नवरंग नवरात्रीचे.


१)पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्याचा.खरंय अजूनही देश पुढारलाय पण स्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे ते कुठेतरी थांबायला हवे.


२)दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा जसे मुलगा हा घराचा वंशाचा दिवा असतो तसेच मुलीला पण वशांची पणती म्हणायला काय हरकत आहे.


३)तिसरा रंग आपल्याच मुलीकडे आपण जबाबदारी म्हणून न पहाता एक मौल्यवान व्यक्ती म्हणून नक्कीच पाहू शकतो.जेणेकरून त्या मुलीला पण त्याची जाणीव होता कामा नये की ती एक जबाबदारी आहे.


४)चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करण्याच्या मानसिकतेचा ही मानसिकता प्रत्येकानेच ठेवायला हवी जेणे करून मुलगी ही स्वावलंबी झाली,स्वतः च्या पायांवर उभी झाली की,तिला कुणापुढे झुकण्याची गरज पडणार नाही.


५)पाचवा रंग स्त्रियांवरचे वरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करण्याचा.लोक स्त्रियांवर खूप व्हायात विनोद करतात आणि त्यातून तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तर हे सुध्दा चुकीचे आहे.


६)सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारिरीक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करण्याचा.अगदी खरं आता स्त्री काही कमजोर  राहिली नाही ती सुद्धा प्रत्येक बाबतीत पुढेच आहे आज स्त्री सुध्दा आपली ताकद दाखवू शकते पण शेवटी समाजाने स्त्रीच्या मानसिकतेला कमजोर करून ठेवलंय त्यामुळे ती पुरुषाच्या ताकदीसमोर कमजोर पडते इतके नक्कीच.


७)सातवा रंग स्त्री ही फक्त "स्त्री" नसून ती अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ अशी "व्यक्ती " असे म्हणायला हरकत नाही ती बाहेरचेच काम नाही तर संसार मुलबाळ सांभाळून प्रत्येक गोष्ट करीत असते म्हणूनच तर ती श्रेष्ठ असते.


८)आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी,वेश्या व्यवसाय ह्याबाबतीत अतिशय कठोर कायदे करून लवकर लवकर त्या पिडितेला न्याय मिळवून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा जेणेकरून पुन्हा असे घृणास्पद कृत्य करताना कोणत्याही पुरुषाने 10 दा विचार नक्कीच करायला हवा.


९)नववा रंग "स्त्री पुरुष समानतेचा"समाजात स्त्रियांना पुरुषाएवढाच मान सन्मान मिळायला हवा.करण अजूनही आपल्या कडे स्त्री ही कर्तृत्ववान झाली असली तरी तिथे भेदभाव हा दिसतोच आहे म्हणून स्त्री पुरुष समानता ही मनापासून स्वीकारायला हवी फक्त दिखाव्याकरिता असली स्त्री पुरुष समानता नको असायला.


शेवटी काय तर आज जर आपण चांगले वागलो तर आपली पुढची पिढी त्याला न्याय देऊ शकेल असे मला तरी वाटते.


आपण खऱ्या रंगासोबतच हे वरील रंग पाळलेत ना तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्यावर खऱ्या अर्थाने प्रसन्न होतील, आणि आपल्याला अनेक आशिर्वाद देतील आणि हाच दिवस हा विजयादशमी चा दिवस असेल होय की नाही.मग सगळ्यांकरिता प्रत्येक दिवसच हा"विजयादशमी"असेल...


मग विजयादशमी ला सोने लुटण्याची गरजच भासणार नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्याचे सोनेच होईल नाही का.मुलीला मुला प्रमाणे वागणूक द्या भेदभाव करू नका.

मुलगी का नकोशी वाटते हो...? जर मुलगीच नसती तर आपल्याला आई,बहीण,बायकोआत्या,मावशी, काकू,आजी मिळाली असती का...?बरोबर ना मग खरंच विचार करा स्त्री भ्रूण हत्या थांबवा,महिलांवर अत्याचार थांबवा हीच खरी घटस्थापना आणि नवरात्र असेल सगळ्यांकरिता.


चला तर मग या वर्षीचे कोरोनाच्या काळातील नवरात्र आणि विजयादशमी वरील नऊ रंगाचा संकल्प करून साजरी करूया.


ऍड. क्षमा बासरकर- धर्मपुरीवार

अध्यक्ष बाल कल्याण समिती,चंद्रपूर

8484082225

Monday, November 2, 2020

स्त्री मनातील स्त्री (स्त्री मन )

                               स्त्री मनातील स्त्री

                                  (स्त्री मन )


फेसबुक वर  माहेरचा कट्टा हा जो प्लॅट फॉर्म सुरू केलाय महिलांकरिता तो खूप छान माहिती पुरविणारा ग्रुप आहे. पण त्यातही काही महिलांनी जे काही अनुभव म्हणा किंवा समस्या म्हणा मांडल्या किंवा व्यक्त केलाय त्यावरूनच मी हा लेख लिहिलायं कारण स्त्रिया ह्या कितीही स्वतंत्र झाल्या असं म्हटलं जातं पण त्या पूर्णपणे स्वतंत्र झाल्या काय हो वाटतं काय तुम्हाला असं आणि म्हणूनच मग  या महिला दिनाच्या निमित्ताने हा लेख लिहावासा वाटला.


खरं तर हा लेख मी खूप आधीच लिहिलेला होता आणि तो परिचयातील लोकांना पाठविला पण पुरुष मंडळी कडणं negative कंमेंट्स मिळाल्या. म्हणजे त्यांना असे वाटले की,मी माझा अनुभव शेअर करते आहे पण हा चुकीचा समज त्यांनी करून घेतला म्हणजे समाजात चाललेल्या चालू घडामोडींवर आपण नाही लिहू शकत काय पण नाही समाजात चुकीचा आणि नकारार्थी विचार करणारे बरेच लोक आहेत ना,मला खूप वाईट वाटले हे सगळे बघून म्हणजे मी एक स्त्री आहे आणि मी स्त्री मन जाणण्याचा च प्रयत्न केला तर कुठे चुकले माझे, म्हणजे मी स्त्री  मनातली स्त्री जाणण्याचाच प्रयत्न केला होता ना.त्यात काय वावगं आहे.

                  

   "बंदिनी स्री ही बंदिनी हृदयी पान्हा नयनी पाणी,जन्मोजन्मीची कहाणी बंदिनी स्त्री ही बंदिनी"           


  महिला,नारी, स्त्री असे अनेक नावाने ओळखली जाणारी स्त्री तिला कधी जगात खूपच मान सन्मान दिल्या जातो तर कधी तिला अगदीच वाईट वागणूक दिली जाते हे आताचच नाही तर हे पूर्वीपासूनच चालत आलय ,पण काळ बदलला सावित्रीबार्इ फुले, रमाबार्इ रानडे, आनंदीबार्इ गोपाळ या सारख्या महिला समाज सुधारकांनी पुढारकार घेउन स्त्रीला तिच्या चूल आणि मूल या जगातून बाहेर काढले. शिक्षण देऊन तिच्या हक्कांची जाणीव करून दिली. तिच्यात परिवर्तन घडवून आणले. त्यांनी केलेल्या महिला शिक्षण चळवळीचा स्त्रियांना फायदा झाला आणि महिला कर्तुत्ववान व कर्तबगार झाल्या. पण आता स्त्री शिकली,पूढे चालली तरी ही समाजात तिला म्हणावा तसा वाव मिळत नाही,का? हाच माझा खूप मोठा प्रश्न आहे का तर ती स्त्री आहे म्हणून पुरुष हा शक्तीशाली असतो,त्याला समाजात स्त्रिया पेक्षा जास्त वाव आहे म्हणून, पण सगळेच पुरुष परिपूर्ण नसतात जसे स्त्रिया घरातले, बाहेरचे दोन्ही काम,आपला संसार ,मुलबाळ सांभाळून करू शकतात तसे सगळे पुरुष नाही करू शकत तरीही स्त्री ही कमजोर आहे असे समजल्या जातं,अरे तुम्ही तिला प्रोत्साहन द्या,तिला पुढे जाऊ द्याल तर अबला स्त्री सुद्धा सबला होऊ शकते,पूर्वीच्या काळी सावित्री बाई फुले,झांशी ची राणी या पण स्त्रियाच होत्या पण त्यांनी पण पुढे होऊन बरेच कर्तृत्ववान कामे केलीत ना इतकी उदाहरणं डोळ्यासमोर असताना सुद्धा अजूनही या कलीयुगात स्त्री ला कमजोर समजल्या जातं, मला असे म्हणायचे नाही की तिला सन्मान दिल्या जात नाही,मग मी आता बऱ्याचदा social media वर बघते तर प्रत्येक वेळेला स्त्री वरून जोक्स आणि काही वाईट गोष्टी लिहिल्या जातात बरेचदा स्त्रियांचे फोटो अपलोड केले जातात की,स्त्री च्या हातात मोबाईल  फोन असतो मुलगा खिशात असतो किंवा असे काहीतरी वायफळ पोस्ट टाकून स्त्री ला कमी लेखल्या जातं म्हणजे तिचं हस केलं जातं ती सतत wtsap आणि मोबाईल वर असते असे दाखवल्या जातं, म्हणजे स्त्रियांनी social media चा वापर करणे गुन्हा आहे काय?हं  पण मी हे पण म्हणींन की  त्याचा ज्यादा अतिरेक पण नको,पुरुष तर ह्याच्या दुप्पट इंटरनेट चा वापर करतात सतत wtsap, fb वर असतात मग त्यांनी त्याचा ज्यादा उपयोग करणे चांगले काय? कित्येकदा मी ऐकते बायकांची कुजबुज चाललेली असते अगं हे घरी आले की, ना सतत मोबाइल घेऊन असतात,जेवताना सुद्धा मोबाईल हातात असतो मग हे चालतं काय? अरे घरी आल्यावर तरी निदान आपल्या बायका पोरांना वेळ द्या त्यांच्या शी मनमोकळं बोला जर तुम्ही असं केलत तर बायका मुलं काय करतील मग घरात सगळे मोबाइल घेऊनच बसतील कुणाचा कूणाशी संवाद प्रकारचं राहणार नाही ,तसेच ह्या पण गोष्टी बऱ्याचदा वाचायला मिळतात की, घरात खूप अपमानास्पद वागणूक मिळते,नवऱ्याचं कुठेतरी बायको मुलं असताना सुद्धा बाहेर दुसऱ्या बाई बरोबर अफेअर असतं, असे वागून त्यांना काय मिळणार असतं नुसता संसार उध्वस्त करणे बाकी काही नाही.मग बायका म्हणतात की मुलांकडे बघून चूप बसावं लागतं पण का म्हणजे माणसाने काही केले तरी स्त्री ने मूग गिळून चुपचाप बसायचे, का तर पुन्हा तोच प्रश्न ती एक स्त्री आहे म्हणून पण मग जी त्या पुरुषाला आपल्या नादी लावते ती पण तर एक स्त्रीच असते ना,मग तिला नाही कळत काय की, आपण कुणाचा तरी संसार उध्वस्त करतोय ते,ती एक मालिका असचं एक कथानक असलेली  झी मराठी वर सुरू आहे "माझ्या नवऱ्याची बायको" अश्या मूर्खा सारख्या सिरीयल काढून अजून पुरुषांना जोर चढतो, आता तर कहरच झाला आहे बघितले ना ते "बिग बॉस" मधले प्रकरण किती shameful,तसेच  नौकरी करणाऱ्या स्त्रियांना खूप मान मिळतो घरात, का तर ती पैसे आणते कमवून म्हणुन,मग जर एखादी स्त्री नौकरी नसेल करत तर तिला काहीच किंमत नाही काय,अरे घर सांभाळणे सुद्धा एक मोठी जबाबदारी च आहे ना अहो,एक साधी गृहिणी जरी ऑफिस ला जाऊन पैसे कमवत नसली ना तरी ती उत्तम प्रकारे घर खर्चाचे नियोजन करत असते,एखादया महिन्यात कमी पैसे असले तरी घरात ती कोणाला काही कमी पडू देत नाही,तिला कधीच कमी लेखू नका कारण तुमच्या घरातली खरी अर्थमंत्री एक गृहिणीच असते.आणि ती सगळे यशस्वी पणे पार पाडतेच की, मग तिला  कमी दर्जा का दिला जातो,तसेच काही मैत्रीणीं कडून हेही ऐकायला मिळाले की आता या social media, wtssp मूळे वगैरे जुने शाळेचे ग्रुप्स वगैरे तयार केले जातात त्यातून पुन्हा जुने मित्र मैत्रिणी एकत्र येतात तर त्यातही भेदभाव होतो म्हणजे नवऱ्याने त्याचा ग्रुप किंवा त्याच्या मैत्रिणी शी संपर्क ठेवायचा पण तोच जर बायको अर्थात स्त्री  चा ग्रुप असेल तर तो मात्र नवऱ्याला अर्थात पुरुषाला पटत नाही का तर ती तुमची बायको आहे म्हणून,मग ती तुमची मैत्रीण पण कुणाची तरी बायको,आई,सून,मुलगी असेलच ना आणि तीच गोष्ट त्या स्त्री ला सुद्धा लागू होते जुन्या ओळखी असतात मान्य ना पण त्या पुरुषाचं सुद्धा लग्न झालेलं असतं मग तो पण कुणाचा तरी नवरा,बाबा,जावई,मुलगा असतोच ना मग असा भेदभाव का केल्या जातो,अजूनही स्त्रीच स्त्रीला समजून घेऊ शकली नाही आहे, काल परवाच facebook वर एक माहेर चा कट्टा नावाचा ग्रुप आहे त्यावर एकीने प्रश्न विचारला होता की कोणा कोणाला सासूबाई आवडतात तर त्यावर बऱ्याच मुलींनी नकारार्थी उत्तर दिलीत का तर सासू बाई मुलीला सगळं विचारून करतात,मुलीला घरात जास्त भाव असतो सुनेला विचारले जात नाही मग असं का केल्या जातं अहो ती आलेली सून पण तर कुणाची तरी मुलगीच असते ना तुमच्या मुलीला तुम्ही तिच्या सासरी पाठवलीत ना मग तिच्या घरी तिला किती लुडबुड करायची ती करू देत ना,पण तुमच्या घरात तुमची सून आल्यावर तिला सोबत घेऊन तिलाच आपली मुलगी मानून चला ना,बघा बरं घरात किती आनंद असेल तर,म्हणजे सुनेने पण सासूबाईला आई सारखं पाहावं आणि सासूबाईंने देखील सुनेला मुलींसारखं पाहावं,मुलाने सुनेच ऐकलं की तो बायकोच्या म्हणण्यात आहे असे मुलांच्या आईचे म्हणणे असते मग तेच मुलीचा नवरा सगळं ऐकत असेल तर  माझा जावई ना खूपच चांगला आहे हो,तो ना माझ्या मुलीचे सगळे ऐकतो आणि इथेच तर तुमचा बायकानं मध्ये किती भेदभाव होतो ते दिसतं.आताच चंद्रपूरला मध्ये मुली विकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आणि एकूण काटाचं आला कारण त्या मुलींना विकणाऱ्या सुद्धा स्त्रियाच होत्या म्हणजे बघा ना स्वतः त्या स्त्रिया असून त्यांनी त्या मुळीच दुःख समजून घ्यायला हवे होते ना कोवळ्या कोवळ्या मुलींना त्यांच्या वयापेक्षा 10 ते 15 वर्ष मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला लग्न करण्यासाठी विकतात बरं इतक्यावरच थांबतात काय हे लोक नाही लग्न करून त्या माणसाची भूक शांत झाली की त्याच मुलीला दुसऱ्या व्यक्तीला विकल्या जायचे किती तो किळसवाणा प्रकार म्हणजे त्या मुलीला एखाद्या बाईला आपल्या मनातलं बोलून दाखवावं असे वाटलेयी असेल कदाचित पण इथे विकणाऱ्याच स्त्रिया होत्या मग त्या स्त्रियांनी त्या मुलीचं दुःख समजायला नको होते काय पैशासाठी स्त्रीच स्त्री ला विसरते. 

कधी कधी खरंच असं वाटतं की,स्त्रीच स्त्री च दुःख समजून घेत नाही.आता मी सासू सुनेचे उदाहरण दिलेच आहे पण असेच ज्या "विधवा" स्त्रिया असतात त्यांच्या बाबतीत पण बरेचदा वाईट अनुभव बघायला मिळतात. म्हणजे नवरा स्वर्गवासी झाला की,त्या बाईला कुठेच म्हणजे सवाष्ण बाईला जे करू दिल्या जातं ते तिला करू दिल्या जात नाही. तिने काळीच टिकली किंवा कुंकू लावायचे लाल टिकली किंवा कुंकू लावायचा नाही असा पूर्वी समज असायचा,तिने हिरव्या बांगड्या,मंगळसूत्र पण घालता येत नाही अशी आणि बरीच बंधन त्यांच्यावर येतात,पण असे का?हा माझा सगळ्याच स्त्रियांना प्रश्न आहे.अरे, त्या स्त्रीचा काय दोष जर तिच्या नवऱ्याचं निधन झाले असेल तर, कारण त्या व्यक्तीचे आयुष्यचं तेवढं असेल तर ती स्त्री तरी काय करू शकते तीची त्यात काय चूक ना! म्हणजे विधवा होणं गुन्हा आहे काय हो?ज्या स्त्री चा नवरा तिला सोडून स्वर्गवासी होतो तेच तर किती मोठं दुःख असतं त्या बाईला आणि त्यात हा समाज असे बंधनं घालून अजून तिचं मन दुखवतो.मग अशावेळेला स्त्री नेच स्त्री ला समजून  घ्यायला हवे ना?मग का तिला समजून घेतल्या जात नाही खुप वाईट वाटतं सगळे बघितले की,असं आपल्या समाजात घडायला नको कारण स्त्रिया ह्या तरुण वयात ही विधवा होतात आणि आपण तर आता बघतोच आहे स्त्री एकटी दिसली की, कसे स्त्रियांचे लचके तोडल्या जातात आणि ह्या जगात एकटी स्त्री म्हटलं की,हजार वाईट नजरा तिच्या कडे बघतचं असतात मग अश्या वेळेला त्या विधवा स्त्री ने लाल कुंकू लावले,गळ्यात मंगळसूत्र घातले तर काय वाईट आहे हो,ती तिच्या बचावासाठी इतकं तर करूच शकते ना, शकुन अपशकुन हे सगळं थोतांड असतं हो, अहो आता आपण २१ व्या शतकात जगतोयं तर आतातरी आपले विचार बदलायला हवेत.आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे स्त्री ही पुरुषांप्रमाणे सगळी कामे करू शकते.आत्ताचच उदाहरण घ्या ना, लेफ्टिनेंट जनरल माधुरी कानिटकर ही देशाची  तीसरी महिला लेफ्टिनेंट जनरल बनली आहे किती अभिमानाची बाब आहे स्त्रियांकरिता आणि त्यांचे पति राजीव पण लेफ्टिनेंट जनरल पदावर आहेत हे असे पाहिल्यांदा झाले आहे की,पति पत्नी दोघेही ३ स्टार होल्ड करणारे लेफ्टिनेंट जनरल पदावर आहेत.सुनीता विलियम सारखी स्त्री चंद्रावर जाऊन येते तरी आपला समाज मात्र मागासलेलाच आहे.

        अहो जग इतक पुढे चाललंय मग अजूनही स्त्री ला का समजून घेतलं जात नाही,तिच्या मनाचा विचार का केला जात नाही,हो कारण एकच ती एक स्त्री आहे म्हणून, नका हो असा अत्याचार करू तसं म्हटलं तर काही ठिकाणी म्हणजे साधारण आणि गरीब घरांमध्ये स्त्री वर अत्याचार होतो पुरुष मारतो वैगरे तर ते दिसून पडतं पण उचभ्रू कुटुंबा मध्ये मानसिक रित्या छळ होतो पण ते बाहेर दिसून पडत नाही अशाप्रकारे समाज अजूनही पूर्णपणे पुढे गेलेला नाही,माझा म्हणणं इतकचं आहे की, स्त्रीचं मन समजून घ्या , तिला कमी लेखू नका.आणि म्हणूनच पुरुषांप्रमाणे स्त्री ने सुद्धा स्त्रीला समजून घ्यायला हवे कारण वेळ आली तर तीच स्त्री दुर्गा आणि चंडिकेचे रूप घेऊ शकते हेही विसरू नका तिला कमजोर समजू नका.


२१ व्या शतकात देखील समाजात स्त्रीचे स्थान खचितच मोठे आहे व मोठेच राहील यात तीळमात्र शंका नाही.म्हणूनच स्त्री ही महानच असते.


आयुष्याच्या घरट्या मघुनी

जीवनाचे सूर साधते

जगते, जगवीते

प्रेमाचे धागे जुळवीते

म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते .


सप्तपदीची सात पाऊले

सात वचने विश्वासाची

अंगारून येते मम गृहा

माप ओलांडुनी तुझे माझ्यात

सामावुन घेते

म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते .


अर्धागिनी, गृहस्वामीनी

कूलवधु, भावी माता

प्रेमाची परिभाषा, विश्वासाची आशा

-हृदयाचे धागे जुळवुनी

बीज उदरी जोपासते

कूलदीपक जीवन आशा तेववीते

म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते.


सौ. क्षमा बासरकर धर्मपुरीवार

सदस्य, बाल न्याय मंडळ,चंद्रपूर

8484082224

असावे घरटे आपुले छान

  

                          असावे घरटे आपुले छान

                                       

                           दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे  

                          स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे 

                                   दोघांनाही जे जे हवे त..." 

                         दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे 

                         जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे

                             स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे 

                                       दोघांनाही जे जे हवे ते......"

                           दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे 

                            जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे

     म्हणूनच माणूस असो वा पक्षी सगळ्यांनाच आपलं घर(घरटं) प्रिय असतं.

मी आताच," अनं मन सुन्न झाले"या माझ्या लेखात स्पष्ट केले होते की,माणसाची प्रवृत्ती ही कशी विकृत झाली आहे स्त्रिया आणि मुलींप्रति, मी पुन्हा म्हणेल की सगळेच पुरुष तसे नसतात पण आपण समाजातल्या लोकांची तुलना ही पक्षी प्राण्यांसोबत नक्कीच करू शकू म्हणजे बलात्कारी जसे हिंस्त्र प्राण्यांप्रमाणे स्त्रियांवर तुटून पडतात,म्हणून आपण त्यांची तुलना प्राण्यांशी करूच शकतो पण तसेच काही चांगल्या गोष्टी ह्या पक्षी,प्राण्यांपासून शिकू पण शकतो बरं काय!

आजचा विषय इतका छान  आहे कि,मी विचार  केला  चला आपण पण काही तरी शेअर करुया.तशी मला निरनिराळे फोटो काढण्याची बऱ्यापैकी आवड आहे काही नवीन दिसले की,त्याला कॅमेरा मध्ये टिपायला आवडतं मला.माझ्या  ह्या कामात मला काही  नविन पाहुण्यांची सोबत घडलीआहे,ते पाहूणे म्हणजे  पक्षी.उन्हाळा  संपत आला कि मला ही आता  त्या  पाहूण्याची सोय  करण्याचा  छंद  लागला  होता.उन्हाळा आला की त्यांच्या करीता पाण्याची आणि दाण्याची सोय करते.गेल्या  जून/जुलै महिनाभर  बुलबुल पक्ष्याचा मुक्काम  माझ्या घरी होता.घरटे बांधणे ते पिल्ले उडून  जाण्यापर्यंत सर्व  जवळून  बघितले.त्यांच्या खाण्याची  सोय,पावसाळ्यात घरटे वाचण्यासाठी  केलेली सोय हे सगळे  करतांना आंनद मिळाला.निर्सगाचा चमत्कार  इतक्या  जवळून  बघता आला आता मात्र  ती पिल्ले उडून  गेले तेव्हा मात्र खूपच त्रास झाला कारण रोज त्यांचा आवाज,त्यांची किलबिल ऐकू यायची, म्हणतो ना माणसांमध्ये जसा जिव्हाळा असतो तसाच जिव्हाळा आम्हाला म्हणजे त्यात माझे मिस्टर आणि मुलाला पण लागला होता सतत आम्ही त्यांना बघायचो आवाज आला नाही त्यांच्या किलबिलाटाचा, की जीव कासावीस व्हायचा की, काय झाले असेल म्हणून,खरंच हे सगळं बघताना खूप मज्जा पण आली आणि ते गेल्यावर तेवढंच दुःख ही झाले.

                    पण खरचं हे सगळं बघताना जाणवले की माणसं काय,पक्षी काय किंवा प्राणी काय प्रत्येकाला आपलं घरटं प्रियच असतं,म्हणतो ना की घराला घरपण बायकामुलांमुळे येतं ते काही खोटं नाही आणि तोच जिव्हाळा मी ह्या पक्षांमध्ये सुद्धा बघितला त्यांची घरटं बनवण्याची जिद्द आणि ते दोघे बुलबुल पक्षी पक्षीण इतके जीव तोडून मेहनत करत होते घरटं बांधण्याकरिता,खरच तसंच आपल्या माणसांमध्ये सुद्धा घडतं पुरुष असो वा स्त्री ती आपल्या घरासाठी, आपल्या पिलांसाठी जीव तोडून मेहनत करतात की त्यांना सर्व सुखसोयी मिळाव्यात म्हणून खरंच खूपच सुंदर अनुभव होता तो की, कसे ते पक्षीं पक्षींण सुद्धा आपल्या पिलांना जन्माला घालण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत होते अगदी दोघेही सोबत सोबत सगळं काम करीत होते हे बघून खूप छान वाटले. असेच माणसांच्या पण आयुष्यात घडतं.जेव्हा घरी नवीन पाहून येणार असतो तेव्हा आनंदाला पारावार उरलेला नसतो एक वेगळाच आनंद असतो तो शब्दात व्यक्त न होण्यासारखा असतो,तसंच काहीसं इथे घडताना दिसले जरी आपल्याला त्या पक्षाची भाषा कळत नसली तरी त्यांच्या हालचाली वरून जाणवत होतं त्या पक्षांच्या आई बाबा होण्याचा जिव्हाळा म्हणा की त्यांची तगमग म्हणा तर अशाप्रकारे त्या बाळाच्या आगमनासाठी त्या आई बाबाची (बुलबुल पक्षीं पक्षिणीची)तयारी सुरू झाली. 

                      त्यांची घरटं बांधण्याची तयारी सुरू झाली आमच्या कडे आम्ही हँगिंग कुंडी मध्ये पण झाडं लावलेले आहेत तर त्यांनी त्यांच्या घरट्या करिता ती जागा निवडली आणि सुरू झाला त्यांचा प्रवास रोज काडी कचरा आणणे आणि त्याला इतके सुदंर प्रकारे विणले की तूम्ही पण दाद द्याल त्या गोष्टीला,म्हणजे बघा ना जसं माणूस आपले घर बांधताना किती विचार करतो की, आपलं घर खूप सुंदर व्हावं तसेच काहीसे मी फोटो टाकणारच आहे तेव्हा बघाल की, किती सुंदर विणले आहे,खरच माणूस जसा आपल्या परिवारासाठी धडपड करतो तसं ते करताना दिसले.सुंदरसं घरटं बांधून झाल्यावर मग त्या पक्षिणीने अंड द्यायला सुरुवात केली असे बघता बघता ८ दिवसात तिने ४ अंडी दिलीत,ती पण इतकी सुंदर होती एकदम निराळा रंग,ते अंड दिल्यावर ते दोघेही अगदी त्याचे रक्षण करत असायचे बिलकुल कुणा इतर पक्षी म्हणा की व्यक्ती म्हणा कुणालाही फिरकू द्यायचे नाही ,आपण जर त्यांच्या घरट्या जवळ गेलो की ते करायचे काही नाही पण जवळून एक गिरकी घालून निघून जायचे कारण त्यांच्याही मनात भीती असणार की त्यांच्या पिलांना कुणी काही करणार तर नाही ना, असंच नेमकं माणसाच्या आयुष्यात होतं मुलांबद्दल आई बाबा पण खूप जागरूक असतात त्यांच्यासाठी ते जीव तोडून मेहनत घेतात आणि विचार तोच असतो सगळ्या आई बाबांचा की मुलाला किंवा मुलीला काहीही कमी पडू द्यायचे नाही,जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या मुलांना मिळायला हवे,त्यांनी आपल्या पायांवर खंबीरपणे उभे राहावे.अशीच तगमग पक्षांमध्ये त्याच्या पिलांप्रति दिसून आली,ते त्यांना जगात आणायचे होते म्हणून  किती धडपड करीत  होते  काही मोठे पक्षी येऊन खूप त्रास द्यायचे त्या बुलबुल पक्षी पक्षिणीला, पण त्या दोघांनी मिळून त्या मोठ्या पक्षांना पण हाकलून लावले तेवढे बळ त्या दोघांमध्ये कुठून आले असेल तर त्यांची ताकत म्हणजे त्यांचे येणारी पिल्लं.मग असे बघता बघता  ४ पिल्लं झालीत आणि मग त्या पक्षांची तगमग सुरू झाली त्या पिलांना दाणा भरवण्याची दोघेही पक्षी पक्षींन जायचे दाणा आणायला पण एक जण थांबायचा आणि दुसरा दाणा आणायला जायचा किती काळजी बघा,इतका पाऊस, वारा, वादळ सोसत ते दोघेही तिथुन हलायचे नाही, तरीही आम्ही त्यांची बऱ्यापैकी सोय केली होती  आणि मग पिल्ल थोडे मोठे झाले आणि त्यांनी त्यांचं बस्तान हलवलं खूप वाईट वाटलं,तसचं बऱ्याच माणसांच्या पण आयुष्यात घडतं की नाही हो म्हणजे मला असं वाटतं की, आई वडील मुलामुलींना धडपड करून शिकवतात, मोठं करतात आणि मुलं नोकरीला लागले की परदेशात नोकरीसाठी जातात आणि कायमचे टिकडचेच होतात आणि आई वडिलांना भारतात मोठ्या शहरात फ्लॅट घेऊन देतात आणि सगळ्या कामांना माणसं लावून देतात आणि बरोबर पैसे पाठवतात, पण मला सांगा की त्या आई वडिलांनी आपल्यासाठी इतकी धडपड केलेली असते तर मग त्या आई वडिलांची नुसतं पैसे पाठवून त्यात त्यांना मुलांचा जिव्हाळा, प्रेम मिळेल काय हो,त्यांना त्यांच्या नातवांच सुख मिळेल काय हो,म्हणूनच मला माणसांची तुलना त्या पक्षांशी करावीशी वाटली कारण करण घरात माणसं असली की कशी सवय लागते सतत त्यांस बघायची आणि त्यांच्या जिव्हाळ्याची तसेच मला सतत त्या पक्षांना बघायची सवय झाली होती.अजूनही गॅलरीत आलं की आधी लक्ष त्या कुंडी कडे जातं.म्हणून त्या पक्षांना तर म्हणावेसे तर वाटतंच पण जे मुलं आपल्या आई वडीलांपासून दूर राहतात त्यांना पण म्हणावसं वाटतं 

               "या पिल्लानो परत फिरारे घराकडे आपुल्या"



सौ. क्षमा आ. बासरकर धर्मपुरीवार,

सदस्य,बाल न्यायमंडळ,चंद्रपुर

फोन न.8484082224


                


Saturday, October 31, 2020

सायबर गुन्ह्याचा महिला आणि बालकांवरील विळखा

सायबर गुन्ह्याचा महिला आणि            बालकांवरील विळखा


सध्याच्या या कोरोना च्या काळात सायबर गुन्ह्यात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे.कारण कोरोनामुळे सगळीच लोक ऑनलाईन व्यवहार करताना दिसतात आहे आणि सध्या घरातल्या घरात असल्यामुळे मनोरंजनाचे साधन म्हणून जास्तीत जास्त फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप,ट्विटर चा वापर वाढल्यामुळे या सायबर गुन्हेगारांना आयतीच मेजवानी मिळते आहे.ते लोकांच्या मागावरच असल्याचे दिसते.सायबर गुन्हा हा फक्त व्यक्तीच नाही तर देशासाठी सुद्धा घातक झालाय आणि हा सायबर गुन्ह्याचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चाललाय.सायबर गुन्हा काय आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही.बरेच लोक यापासून अनभिद्य आहेत. मी माझ्या मागच्या "प्रसंगावधान"या लेखात थोडक्यात माहिती दिली होती पण आता सायबर गुन्ह्याचे किती प्रकार असतात ते पण थोडं सविस्तर सांगून लोकांना जागरुक करावं असं वाटतं.

                   इंटरनेटमुळे जग जोडले गेले आहे. सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी अवघ्या काही क्षणांत आपल्यापर्यंत पोहोचतात. आता हेच समाज माध्यम छळाचे अस्त्र बनू पाहत आहे. प्रामुख्याने याचा फटका तरुणी, महिला, बालक यांच्यासह पुरुषांनाही बसत आहे.सायबर गुन्हे हा दिवसेंदिवस चितेंचा विषय बनतो आहे. या क्षेत्राचा दैनंदिन जीवनात अधिक वापर होऊ लागल्याने रस्त्यावरील गुन्हेगार सायबर गुन्ह्यांकडे वळले आहे. समाज माध्यम म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर ही तर गुन्हेगारांसाठी खुली मैदानेच ठरत आहेत. बॅंकिंग फसवणूक, विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून फसवणुक करणे, फसवे ई-मेल पाठवणे या सर्व गुन्हयाबरोबरच एकंदर समाज माध्यम हे गुन्हेगारांचे अस्त्र बनत आहे. समाज माध्यमांपैकी व्हॉट्सॲप,इनस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर अधिक प्रमाणात केल्या जात आहे.

जगातील लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्येपेक्षा अधिक लोक समाज माध्यमांवर सध्या ॲक्टीव्ह आहेत. संभाषणाची सगळ्यात सोपी आणि तेवढीच गतीमान पद्धत म्हणून याकडे पाहले जाते. मात्र, जेथे जास्तजण तेथेच गुन्हेगारही आपले बस्तान बसवितात. अगदी तसाच प्रकार सायबर जगातही झाला आहे. सायबर हॅकर (गुन्हेगार) यांनी विविध माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणे, फसवणूक करणे, बदनामी करणे यासह मुळ फोटो वा दस्ताऐवजात बदल करून हेच खरे आहे असे ठासून सांगून एकप्रकारे त्या व्यक्तीची नवीच छबी तयार करतात. सध्या हा प्रकार सर्रास वाढला आहे. 

आपण प्रथम सायबर गुन्हेगारीविषयी बोलू. याचा फटका अगदी सर्वसामान्य माणसापासून ते एखाद्या देशाच्या मोठ्या कंपनीला/बँकेला बसू शकतो. 

१) फिशिंग(phishing)

उदाहरणार्थ "फिशिंग" नावाचा एक गुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर घडवला जातो की, खरे म्हणजे त्याविषयी इंटरनेटचा वापर करणाऱ्या सगळ्यांनाच माहिती असणे खूप गरजेचे आहे. पण तरीही सतत इंटरनेट नव्याने वापरायला सुरुवात करणारी निष्पाप माणसे या प्रकाराला सतत बळी पडतात. या प्रकारात इंटरनेटवरचे सायबर गुन्हेगार सर्वसामान्य लोकांना भुलवून, घाबरवून किंवा फसवून त्यांचे नुकसान करतात. त्यासाठी ते आधी आपल्याला एक घाबरवणारा किंवा भोवळघालणारा ई-मेल पाठवतात. उदाहरणार्थ त्या ई-मेलमध्ये ‘तुमच्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड एका हल्लेखोराने मिळवला आहे ...त्यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी लगेच तुमचा पासवर्ड बदला...’ असे लिहिलेले असते. त्यासाठी या ई-मेलमध्ये एक ‘लिंक’ दिलेली असते. त्या लिंकवर आपल्या संगणकाचा माऊस नेऊन त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर आपल्या बँकेची वेबसाइट उघडली जाते असे आपल्याला वाटते. खरे म्हणजे ही आपल्या बँकेची वेबसाइट नसतेच मुळी. ती तर त्या सायबर गुन्हेगाराने तयार केलेली स्वत:ची वेबसाइट असते. पण ती हुबेहूब आपल्या बँकेच्या वेबसाइटसारखी दिसत असल्यामुळे आपल्याला ती आपल्या बँकेचीच वाटते! तिथे "तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी सध्याचा पासवर्ड भरा"वगैरे गोष्टी लिहिलेल्या असतात. आपल्याला सायबर गुन्हेगारांचे हे काम माहीत नसल्यामुळे आपण गुपचूप ही माहिती भरतो आणि आपल्याला जो नवीन, बदललेला पासवर्ड हवा आहे तोही तिथे टाइप करतो. मग "पासवर्ड" बदलल्यामुळे आता सगळे ठीकठाक आहे, धन्यवाद’ वगैरे गोष्टी आपल्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसतात आणि आपल्याला हायसे वाटते. पण इथेच सगळा घोटाळा झालेला असतो. सायबर गुन्हेगारांने हा ई-मेल आपल्याला स्वत:च आपल्या बँकेच्या नावाने पाठवलेला असतो. त्यातही त्याने माहिती अशा प्रकारे लिहिलेली असते की, आपला त्यावर चटकन विश्वास बसतो. तसेच हा ई-मेल त्याने अगदी आपल्या बँकेचा वाटेल अशा ई-मेल आयडीवरून पाठवलेला असतो. त्यामुळे तो खरेच आपल्या बँकेकडून आलेला आहे, असे आपल्याला वाटते. तसेच त्या ई-मेलमध्ये त्या सायबर गुन्हेगारांनी दिलेली ‘लिंक’ आपल्याला आपल्या बँकेच्या वेबसाइटवर घेऊन जाते असे आपल्याला वाटत असले तरीही ती प्रत्यक्षात मात्र आपल्याला त्या सायबर गुन्हेगाराच्या बोगस वेबसाइटकडे नेत असते. मग तिथे आपण आपल्या बँकेचा युजर आयडी आणि पासवर्ड टाइप केला की, तो त्या सायबर गुन्हेगाराच्या हाती लागतो! मग तो सायबर गुन्हेगार ही माहिती वापरून स्वत: आपल्या बँकेच्या खऱ्या वेबसाइटवर जातो आणि तिथे आपल्याकडून मिळवलेला आपला खरा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपल्या खात्यातले सगळे पैसे स्वत:च्या खात्यात  वळवतो.हा झाला सायबर गुन्ह्याचा एक प्रकार.

Phishing shall be punished with imprisonment upto 3 yrs and fine upto 1 lakh rupees.sec 66(D) information technology act.


२) चाईल्ड पोर्नोग्राफी( child pornography)

चाईल्ड पोर्नोग्राफीत भारत सर्वात अव्वल आहे.पॉर्न व्हिडिओ अपलोड करण्यात लहान आणि किशोरवयीन मुलांची संख्या अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळेच schoolgirls, teens आणि desi girls हे सर्वाधिक वापरले जाणारे key words आहेत.चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजे १८ वर्षाखालील बालकांवर होणारा लैगिंक अत्याचार आणि त्याचं चित्रीकरण करणे याला चाईल्ड पोर्नोग्राफी असे म्हणतात.खाऊ, खेळणी,मोबाईल गेम इत्यादींचे  आमिष दाखवून बालकांवर लैंगिक अत्याचार केले जातात.

Child pornography sec 67 (B)shall be punished on first conviction with imprisonment of either description for a term which may extend to five years and with a fine which may extend to ten lakh rupees and in the event of second or subsequent conviction with imprisonment of either description for a term which may extend to seven years and also with fine which may extend to ten lakh rupees:

३) सायबर ग्रुपिंग(cyber grooping)

समाज माध्यम किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे मुलांचं लैंगिक किंवा अन्य प्रकारे शोषण करण्याच्या उद्देशाने जवळीक निर्माण केली जाते.सायबर ग्रुमर भेटवस्तू,प्रशंसा,मॉडेलिंगमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष देत जवळीक वाढवतात.पुढे अश्लील संदेश,छायाचित्र किंवा व्हिडीओ  पाठवू लागतात.पुढे आपले नुड्स फोटो,खाजगी फोटोसह व्हिडीओ पाठविण्यास सांगतात.आणि अशाप्रकारे ते लैंगिक शोषण करू शकतात.

Cyber grooping shall be punished with imprisonment for a term which may extend to three years, or with fine which may extend to one lakh rupees, or with both.sec 66 (B) Information technology act.

४) सायबरबुलिंग (cyberbullying)

स्त्रियांना, मुलींना धमकी देत त्यांना मानसिक त्रास दिला जातो.अश्लील किंवा हानिकारक संदेश,टिपण्या आणि व्हिडीओ पाठवून एखाद्याला त्रास देण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाईल तंत्रज्ञानचा वापर केला जातो.सायबर गुन्हे करणारी व्यक्ती मजकूर,संदेश,ई-मेल,सोशल मीडिया, संकेतस्थळ, चॅट रूम्स इत्यादींचा वापर करतात.यामुळे गंभीर स्वरूपाचे भावनिक, शारीरिक,सामाजिक आणि मानसिक परिणाम जाणवतात.

Cyber bullying shall be punishable with imprisonment for a term which may extend to three years and with fine.section 66 -(A) of IT act.

५)  मॉर्फिंग(morphing)

सायबर मॉर्फिंग मध्ये एखाद्या  व्यक्तीचं मूळ छायाचित्र बदललं जातं.महिलांची किंवा तरुणींची छायाचित्र डाउनलोड करून,अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाईटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाईल बनविले जातात.

Morphing shall be punished on first conviction with imprisonment of either description for a term which may extend to three years and with fine which may extend to five lakh rupees and in the event of second or subsequent conviction with imprisonment of either description for a term which may extend to five years and also with fine which may extend to ten lakh rupees. only if you like it.(Section 67 in The Information Technology Act).

६) सायबर डिफेमेशन( cyber defamation)

चुकीचं विधान करून व्यक्तीच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहचवीली जाते.चारित्र्य हननाच्या उद्देशाने ई - मेल किंवा समाजमाध्यमांवर पोस्ट टाकली जाते.

Cyber defamation sec 77(B)punishable with imprisonment of three years and above shall be cognizable and the offence punishable with imprisonment of three years shall be bailable.

७) सायबर स्टॉकिंग( cyber stalking)

एखाद्या व्यक्तीच्या ऑनलाईन हालचालींचा पाठलाग करणे,त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांची वयक्तिक माहिती गोळा करून ती सोशल मीडियावर प्रसारित करणे.अशी संवेदनशील माहिती गोळा करून सायबर स्टाकर नाव,कौटुंबिक पार्श्वभूमी,आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे पीडितेच्या दैनंदिन व्यवहारात प्रवेश करतो.शिवाय पीडितेच्या नावाने  संबंधित वेबसाईटवर माहिती पोस्ट करतो.

Cyber stalking shall be punished with imprisonment for a term which may extend to two years, or with fine which may extend to one lakh rupees, or with both.(sec 72 of Information technology act)


८) ऑनलाईन गेमिंग(online gaming)

मुलं मोबाईल, संगणक,पोर्टेबल गेमिंग डिवाईसचा वापर करून सोशल नेटवर्क वर ऑनलाईन गेम खेळतात.उदाहरणार्थ:- ब्लू व्हेल, पब जी मात्र याच ऑनलाईन गेमिंग च्या अतिरेकापायी मुलं चोरी,आत्महत्या यासारख्या गुन्ह्यांना बळी पडतात.

समाज माध्यमांचा वापर करताना काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. विशेषकरून महिलांनी तर सावधगिरी बाळगली पाहिजेच. फोटो, माहिती, संपर्क क्रमांक, पत्ता यासारख्या वैयक्तिक बाबी शेअर करू नयेत. याच माहितीचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतात आणि त्याआधारे महिलांना फसवले जाते किंवा त्यांचा छळ केला जातो.समाज माध्यमांचा अशाप्रकारे गैरवापर केल्या जाऊ शकतो.

- प्रेमास नकार दिल्यामुळे बदनामी 

- लग्नाचे आमिष देऊन फसवणूक 

- चित्रफीत, फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल 

- भांडणाचा बदला घेण्यासाठी अपप्रचार 

- अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल 

- फोटोमध्ये छेडछाड करून दुरूपयोग. 

अशाप्रकारे समज माध्यमांचा दुरुपयोग होऊ शकतो तर सावधान राहून समाज माध्यमांचा वापर करायला हवा तर त्यासाठी महिला, मुलं, पुरुष ह्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवायला हव्या:- 

- अनोळखी व्यक्तीला 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवू नका अथवा स्वीकारू नका.

- समाज माध्यमांवर फोटो, व्हिडीओ सर्वांनाच दिसतील, असे ठेऊ नका. 

- महिलांनी संपर्क, पत्ता तसेच इतर वैयक्तिक माहिती टाळावी.

- व्हॉट्सॲपवर डीपी, स्टेटस ठेवताना जपून ठेवा.

- सायबर कॅफेमधून समाज माध्यमांचा वापर करताना विशेष काळजी घेणे  आवश्यक आहे.

- आयडी, पासवर्ड कुणी पाहणार नाही, याची खबरदारी घ्या .

अशाप्रकारे आपण सावध राहिलो तर आपल्याला कुणी फसविण्याचा प्रयत्न करणार नाही आणि हा सायबर गुन्ह्याचा विळखा जो आहे तो आपोआप सुटेल.चला तर मग सावधगिरीने आपण आपले सगळे व्यवहार करूया.


ऍड.क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

बा. क.स.अध्यक्ष चंद्रपूर 

८४८४०८२२२४












माझ्या माहेरचे अंगण




 बघा आवडतंय काय 👇           


                  माझ्या माहेरचं अंगण


कोरोना कोरोना कोरोना खरंच त्रासलेत सगळे हया कोरोना मुळे. किती तो त्रास बरं लहान मुलांपासनं तर मोठ्यांपर्यत सगळ्यांनाच त्याच्या मुळे त्रास होतोय पण तो मात्र कमी व्हायचं नावच घेत नाही आहे दिवसागणिक तो वाढतोच आहे.गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत सगळ्यांनाच त्याने वेठीस धरून ठेवलंय,त्याने कोणालाही कुठलेही सण देखील साजरे करू दिले नाही म्हणजे तो(कोरोना)कितीही वाईट असला ना तरी काही बाबतीत या समाजाला चांगलाच धडा शिवून गेलाय असे म्हणता येईल,खरंच सर्व धर्म समभाव ठेवायला हवा भेद भाव करू नये तेच इथे घडताना दिसतंय, राजकीय पक्षातील लोक सुद्धा या अश्या परिस्थितीत राजकारण सोडून बाकी सगळं विसरून आता लोकांनी लोकांसाठी कामाला/मदतीला यायला पाहिजे असे सांगू लागलेत.


खरं सांगायचं तर कोरोना हा तर डिसेंबर पासून सुरू झाला होता पण तेव्हा कुणालाही त्याच गांभीर्य इतकं कळलंच नसावं आणि कुणी त्याला इतकं गांभीर्याने घेतले पण नाही पण खरी सुरुवात झाली ती मार्च पासनंमुलांच्या परीक्षा जेमतेम सुरूच झाल्या होत्या की,अचानकपणे त्या कोरोनाच्या भीती पायी हळू हळू सगळं बंद बंद ची सुरुवात झाली.lockdown मुले शाळा तर बंद झाल्याचं पण अशी वेळ आली की, पेपर देखील मुलांचे रद्द करावे लागले.लहान मुलांचे ठीक आहे हो पण मोठ्या मुलांच्या जेव्हा परीक्षा रद्द झाल्या तेव्हा हुशार आणि टॉपर असलेल्या मुलांना जरा जडच गेलं ते,कारण जेमतेम पास होणारे मुलंही चांगले grade घेऊन पास झालेत पण असो जीवापुढे कुठे काय चालतं असं म्हणतात ना "सर सलामत तो पगडी पचास",तसच झालं ते,माणूस चांगला राहिला तर कितीही परीक्षा देता येतील.


नवीन नवीन जेव्हा  lockdown सुरू झाले तेव्हा सगळ्यांनाच मस्त वाटायचे कारण सगळे जण आपापल्या घरी एकमेकांना वेळ देऊ लागले. नाहीतर आता पूर्वी सारखी एकत्र कुटुंब पद्धती राहिलीये तरी कुठे, असली तरी ती बोटांवर मोजण्या इतपतच कुटुंब तसे उरले असावेत पण या कोरोना मुळे म्हणा की, काय प्रत्येक जण घरात राहून वेळ देऊ लागला,आपले छंद जोपासू लागला असे बरेच काही करता यायला लागले,नवीन नवीन तर किती उत्साह होता सगळ्यांना, नवीन नवीन पदार्थ करणे, खाऊ घालणे त्याचे फोटो फेसबुक, wtsap स्टेटस वर share करणे असे बरेच काही सुरू होते,तसेच स्त्रियांना पण बराच उत्साह होता त्या पण वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करून टाकणे असे सगळे सुरू होते,पण जसा जसा वेळ जायला लागला तसा तसा आता लोकांचा उत्साह कमी होत चाललाय आणि कोरून विषयीची भीती पण कमी होत चालली आहे.


या सगळ्या कोरोनाच्या प्रवाहात मुली-सुनांना यंदा  माहेरपण उपभोगायला मिळाले नाही.माहेरपण म्हटलं की सगळ्यांनाच एक वेगळा आनंद उत्साह असतो प्रत्येकच आजी-आजोबाला आपलं गोकुळ गजबजलेलं असावं असं वाटत राहतं.असाच एक संवाद आजी-आजोबा,आई- बाबा,सासुसासरे म्हणा सगळ्यांमध्येच होत असावा.आजकाल मूलं-सूना,जावई-मुलगी कितीही लांब राहत असले तरी वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदातरी आपल्या मूळ गावी आजोळी पंजोळी भेट देऊन आठ दिवस सासरी आणि आठ दिवस माहेरी येऊन मनसोक्त आनंद घेऊन त्या आठवणी आपल्या सोबत शिदोरी म्हणून घेऊन जातात नात्यांमधली मज्जाच काही और असते खरंय ना.तसाच एक माझ्या कल्पनेतील तो संवाद मला इथे सांगावासा वाटतोय.एका आई बाबांचा हा संवाद बघा अक्षरशः डोळ्यात पाणी आणतो की नाही.


आई म्हणते :- अहो,ऐकलं काय यंदा आपलं गोकुळ काही गजबजायचं नाही हो.

बाबा म्हणतात :- का गं असं का म्हणते आहेस.

आई म्हणते :- अहो,लेकरं येतात तेव्हा दरवर्षी  काय थाट असतो घराचा नाही का?

बाबा ऐकत असतात खिडकीबाहेर बघत...त्यांना तरी कुठं करमत होतं,ह्या कोरोनामुळे पोरी यंदा माहेरपणाला येऊ शकणार नाही हे स्पष्ट दिसत होतं मग बाबांनी आईला दिसणार नाही अशी हळूच मान वळवून त्यांनी चष्मा काढून डोळे पुसले आणि ते बडबडू लागले,ते ऐकताना आईच्या डोळ्यांची धार काही केल्या थांबत नव्हती.


        दरवर्षीच्या उन्हाळ्याची चाहूल आणि त्यात मुली/मुलं येणार असले की, मनाला  जो गारवा मिळतो तो औरच असतो,तिचं  येणं म्हणजे घरभर प्राजक्त होऊन दरवळण तिच्या लेकरांच्या किलबिलाटाने गजबजलेलं आपलं हे घरटं किती सुंदर वाटतं ते  सुंदर क्षण कसे धरून ठेवावे वाटतात पण ते क्षणही लगेच संपू लागतात.


चार दिवसांपासुन गजबजलेले घर एकदम शांत होऊ लागतं,ती येणार म्हणुन वाटेवर लागलेले आनंदी, उत्सुक डोळे आज सतत ती जाणार म्हणुन भरून येत असतात,हात, पाय ,मन कोणीच कामं करायला तयार नसतं,कारण आज त्या घरट्यातली पिल्लं पुन्हा आपल्या घरी निघणार असतात. ती थकलेली आई  हळूच स्वयंपाकघरात जाऊन पदराने डोळे पुसत तिच्यासाठी लोणचे,चटण्या,फराळाचे बांधुन तिच्या बॅगवर आणून ठेवत असते,बाबा येता जाता नातवंडांचे पसरलेले कपडे जमा करून बॅगवर आणुन टाकत असतात,मुलगी आपलं दोन दिवसात माहेरच्या अंगणात रेंगाळलेल मन गोळा करत असते. आणि म्हणूनच तिला तर काही सुचतच नसते,'चला उशीर नको व्हायला',या सुचना देखिल त्यांना ऐकून न ऐकल्यासारख्या वाटत असतात,आणि मग त्या अंगणातल्या परिजातकाकडून मग तुळशीच्या कानात आई बाबांच्या काळजीचं वचन घेऊन घरात येतात पोट भरावं म्हणून जेवणं होतात,आवडीची भाजी देखिल आज मन आनंदी करू शकत नाही,घड्याळ आज जास्तच वेगाने पुढं पळत असते असं त्यांना आणि त्यांच्याआईबाबांना पण वाटत असतं,आजोबांचं चारदा नातवंडांना गोंजारून झालं असतं,मामाची देखिल भरपूर मस्ती करून होते भाच्यांशी.


        तिला लग्नाच्या आधीच्या सगळ्या आठवणी डोळ्यात जमा व्हायला लागतात,आपल्या साठी आपल्या आई बाबांनी केलेले कष्ट आठवतात,तिला मनात वाटतं खरंच काय हि रीत लावली आहे समाजाने जिथे ज्या अंगणात मुली मोठया झाल्या तिथून एक दिवस जाऊन रुजावचं लागतं दुसऱ्याच्या अंगणात पण त्यामुळेच का होईना कदाचित हि रितच असावी आपली आणि आपल्यानंसाठी  ओढ निर्माण होण्यासाठी आणि म्हणूनच ओढ ही वाढत असावी,म्हणूनच आलं कि मन रेंगाळत,पाय निघत नाही माहेरहून आणि माहेरी यायचंय ह्या कल्पनेने,फुलपाखरू होऊन मन आधीच या अंगणात आनंदाने भिरभिरत राहतं, ती हरवते त्या आपल्या माहेरच्या सगळ्या आठवणीत.

शेवटी माहेरून सासरी निघण्याची ती वेळ येतेच,आई कुंकू लावून आपले अश्रू रोखत तिची ओटी भरते,बाबा नातवंडांना पैसे देऊन पापे घेऊन आपले अश्रू लपवत मुद्दाम बाहेर पडतात,ती पण आपलं रडणं रोखून ठेवते आणि उगाच करड्या आवाजात त्यांना एकमेकांची काळजी घ्यायला सांगते,गाडी नीघते एवढया वेळ लपलेले अश्रू टपकन ओघळायला लागतात,गाडी दिसेनाशी होई पर्यंत ह्या दोघांचे हात टाटा करत असतात,गाडीत मात्र क्षणात टचकन ओले झालेले डोळे परत सासरच्या वाटेवर धाव घेतात, माहेरची वाट तिला विसरावीच लागते कर्तव्यासाठी,आपलेपणासाठी लग्न झाल्यावर तीच आपली माणसं,तेच आपलं घर यासाठी.

  माहरेच्या वाटेवरचे हे डोळे मात्र कोरडे होतच नाहीत कारण ती आठवणींची ओल डोळ्यात कायम ठेऊन ते डोळे तसेच त्या माहेरवाशिणीच्या वाटेवर आस लावून बसतात पुन्हा तिच्या आठवणींची फुलं गोळा करायला..

असंच असत ना सगळं....

आईला ते सगळं ऐकून बोलता पण येत नाही पण तरीही आपला कठोर हा नवरा लेकीसाठी किती हळवा हे बघून ती सुखावते आणि रडतच म्हणते,

  " पण यंदा सगळ्या माहेरची अंगण सुनी सुनीच राहिली नाही का," आता मात्र ते दोघेही भरभरून रडून घेतात..तेवढ्यातच व्हिडिओ कॉल येतो,अर्थात तिचाच.......आणि ती त्यांना विचारते आई बाबा डोळे का असे पाणावलेत तुमचे?दोघेही लगेच म्हणतात तुझ्या आणि नातवंडाच्या आठवणीने गं..फोनवर दोन्ही बाजूने आता फक्त हुंदके ऐकू येत असतात.देश कितीही प्रगत झाला आणि कितीही इंटरनेट सुविधा असल्या तरी इंटरनेट  वरून आपण माहेरपण अनुभवू शकत नाही हेही तितकेच खरे,खरे की नाही तुम्हीच सांगा.


(आणि सगळेजनच मनोमन म्हणत असतात जा रे कोरोना लवकर निदान दिवाळीला तरी फुलवू दे माझ्या माहेरचं अंगण)


ऍड. सौ. क्षमा आ.बासरकर- धर्मपुरीवार

सदस्य, बाल न्यायमंडळ,चंद्रपूर.

फोन न.८४८४०८२२२४

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व…

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व… काही प्रसंग आयुष्यात असे घडतात की ते आपल्याला निसर्ग, प्रेम, माया आणि कर्तव्य यांचा खरा अर्थ शिकवून जातात. आमच...